ETV Bharat / state

विकासाच्या योजना घेऊन मतदारांसमोर जाणार; महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांचा निर्धार - Hemant Savara Announcement

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 8:32 PM IST

Hemant Savara Announcement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासात्मक कामामुळे आणि महिला, युवक तसंच शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध लाभांच्या योजनांमुळे निवडणूक आपल्यासाठी सोपी आहे. विकासाच्या योजना घेऊनच आपण मतदारांसमोर जाणार आहोत, अशी माहिती पालघरचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांनी दिली.

Hemant Savara Announcement
डॉ. हेमंत सावरा (Reporter)

पालघर Hemant Savara Announcement : पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अनेक जण इच्छुक असताना आपल्यालाच उमेदवारी का मिळाली याबाबत सांगताना डॉ. हेमंत सावरा म्हणाले की, गेल्या १४-१५ वर्षांपासून आपण पक्षासाठी इमाने-इतबारे काम करत आहोत. पक्षाची संघटनात्मक बांधणी केलेली आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अनेक विकासकामे केली आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड मतदारसंघातून निवडणूक लढलो. त्यानंतर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं. मी केलेल्या लोकोपयोगी कामाची राज्यातील आणि केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन मला उमेदवारी दिली.

खा. गावित कामांचे प्रचारात योगदान : माझी उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारली तरी मी मात्र लगेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द देऊन त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले. डॉ. गावितही लगेच प्रचारात सहभागी झाले आहेत. प्रचाराच्या प्रक्रियेत ते हिरीरीने भाग घेत असून त्यांनी केलेली विकास कामे लोकांसमोर घेऊन जात आहेत. कामाचा आढावा घेत आहेत.

दलाल हा शब्द वैयक्तिक : वाढवण बंदराचा प्रश्न या भागात चर्चेला आहे. महायुतीच्या विरोधात वाढवण बंधर समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेचं लक्ष वेधता डॉ. सावरा म्हणाले की, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदर विरोधकांसाठी वापरलेला ‘दलाल’ हा शब्द हे त्यांचे वैयक्तिक मत होतं. त्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाने त्यांच्या विधानाशी सहमती दर्शविलेली नाही. त्यामुळे या विषयाचा फार काही परिणाम होणार नाही.

नागरी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : विकासाच्या मुद्द्यांना जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. शेतकरी, व्यापारी आणि अनेक घटकांचा प्रतिसाद चांगला आहे. पालघर जिल्ह्यात कुपोषण, स्थलांतर, आरोग्य, शिक्षण आणि अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांपैकी काही प्रश्न मार्गी लागले आहेत; परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आता त्यावर काम करावे लागेल. वसई, विरार परिसरात शहरीकरण होत आहे. नागरी लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येत असून त्या सोडवण्यास प्राधान्य द्यावं लागेल. सागरी भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. मच्छीमारांच्या समस्या आहेत. केंद्र तसंच राज्य सरकारच्या मदतीनं या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी समन्वयातून जिल्ह्याचा अधिक चांगला विकास व्हावा, यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन एक प्रारूप आराखडा तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितलं.

विरोधक धास्तावलेले : पालघर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या आहेत. सुनील तटकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्य आणि देश पातळीवरचे नेते येथे येणार आहेत. आमची लढत अन्य कोणाशीच नसून आमच्याशीच आहे. बहुजन विकास आघाडी किंवा महाविकास आघाडी आमच्या शर्यतीत कोठेही नाहीत. ते आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी आपण मात्र या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे. आमची प्रचाराची दिशा ठरलेली आहे. समन्वयाने आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही; उलट आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधक धास्तावले आहेत, अशी टीका डॉ. सावरा यांनी केली.

हेही वाचा :

  1. राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election
  2. मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024
  3. मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.