ETV Bharat / state

चंद्रपूर लोकसभा 2024 : भाजपकडून 'यांची' नावे आहेत चर्चेत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 5:11 PM IST

Chandrapur Loksabha 2024
अ‍ॅड. संजय धोटे

Chandrapur Loksabha 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून 2024च्या निवडणुकीकरता सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर या दोघांची नावे चर्चेत होती. मात्र, या दोघांनाही पक्षाने लोकसभा निरीक्षक म्हणून नेमल्यानं ते यंदाची लोकसभा निवडणूक लढू शकणार नाहीl. अशा परिस्थितीत चंद्रपूरमधून माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांची नावे चर्चेत आली आहेत.

चंद्रपूर Chandrapur Loksabha 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वांना लागले आहेत. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपा पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत होती. मात्र, काल भाजपाने लोकसभा निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आणि या चर्चेला आता विराम लागला. यात मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोघांची नावे असल्याने आता 2024 चा भाजपचा उमेदवार कोण यावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. अशातच माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांची नावे चर्चेत आली आहेत. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे.


2019 ची लोकसभा निवडणूक : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाची लाट असताना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मात्र भाजपाला धूळ चारत काँग्रेस पक्षाकडून बाळू धानोरकर जिंकून आले. यात सलग दोन वेळा निवडून आलेले तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पराभूत झाले. भाजपाला हा पराभव जिव्हारी लागला. याची अनेक कारणे होती. सलग दोनवेळा निवडणूक आल्याने त्यांच्याबाबत मतदारांमध्ये एक नाराजीचा सूर होता. हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात असलेले मतभेद हा मुद्दा देखील त्यात होता. मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात अहिर यांना कमी मते मिळाली. याबाबत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. आपला पराभव हा धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. हा पराभव आपला नसून तो भाजपाचा आहे का, यावर आत्मचिंतन करणं आवश्यक असल्याचं शल्य त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. दूधवाला आणि दारुवाला हा प्रचार देखील भाजपाच्या अंगलट आला. दूधवाला म्हणून अहिर यांचा प्रचार केला गेला तर बाळू धानोरकर यांना दारुवाला म्हणून संबोधित करण्यात आलं. हा मुद्दा मतदारांच्या पचनी पडला नाही. बाळू धानोरकरांनी विजयाची चांगली पूर्वतयारी केली होती. या लोकसभा क्षेत्रात कुणबी समाजाचं प्राबल्य असल्यानं याचा सर्वाधिक लाभ धानोरकर यांना झाला. धानोरकर हे याच समाजाचे असल्याने या समाजाने धानोरकर यांना एकगठ्ठा मतदान केलं.

अहिर, मुनगंटीवार यांची नावे चर्चेत : भाजपा पराभूत झाल्यापासून पक्षाने या लोकसभा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते. केंद्रीय मंत्री हरजीतसिंग पुरी, भूपेंद्र यादव, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला होता. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर या लोकसभा क्षेत्राचे समीकरण बदलले. यादरम्यान अहिर यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले. ह्या लोकसभा निवडणुकीत अहिर आणि मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अहिर कामाला लागले. त्यांनी दौरे करायला सुरुवात केली. मुनगंटीवारांनी देखील पक्षाने जबाबदारी दिली तर आपण निवडणूक लढवू असे संकेत दिले होते. त्यामुळे या दोघांपैकी पक्ष कुणाला तिकीट देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.


संजय धोटे, अशोक जीवतोडे यांची नावे चर्चेत : काल भाजपाने अचानक 23 लोकसभा क्षेत्रात नियुक्त केलेल्या निरीक्षकांची यादी जाहीर केली. यात सुधीर मुनगंटीवार यांना बीड लोकसभा क्षेत्राची जबाबदारी तर अहिर यांना रावेर (जळगाव) लोकसभा क्षेत्राचा भार देण्यात आला. त्यामुळे आता या दोघांच्या नावाला पूर्णविराम लागला आहे. काही दिवसांपूर्वीच आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिले होते तर अहिर यांची देखील तशी तयारी दिसून आली नाही. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार संजय धोटे यांचं नाव चर्चेत आलं आहे. संजय धोटे हे 2014 मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून भाजपाकडून निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. परंतु, आता सध्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील त्यांच्या नावाचा पाठपुरावा केला जातोय, अशी माहिती आहे. अ‍ॅड. धोटे हे धणोजी कुणबी समाजातून येतात. या समाजाचे या लोकसभा क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर नुकताच भाजपामध्ये प्रवेश करणारे ओबीसी संघटनेचे ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे यांचं नाव देखील चर्चेत आहे. ते देखील कुणबी समाजातून येतात. त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे जाळे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात पसरले आहे. मात्र, पक्ष नेमका कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतो, याबाबत आज पक्ष श्रेष्ठींकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

  1. नाद खुळा; 'या' जिल्ह्यातील मराठा बांधव लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दाखल करणार उमेदवारी अर्ज
  2. 'या' तारखेला लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, निवडणूक आयुक्तांचा अंदाज
  3. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; संविधान भेट देत केली 'ही' मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.