ETV Bharat / state

मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळांना उचकवण्याचा भाजपाचा प्रयत्न, अंबादास दानवे यांची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 9:03 PM IST

Ambadas Danve
अंबादास दानवे

Ambadas Danve News : भाजपाचं धोरण दुटप्पी आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचं समर्थन करायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मराठ्यांविरुद्ध उचकवण्याचं धोरण भाजपानं स्वीकारलं आहे, (Maratha Reservation) अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. पालघर येथे जनता दरबार घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

छगन भुजबळांबद्दल बोलताना अंबादास दानवे

पालघर Ambadas Danve News : मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीचा लढा यामधील भाजपाची भूमिका असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आठ दिवसांत निर्णय होऊन उमेदवार यादी ही जाहीर होईल, असं त्यांनी सांगितलं.

  • मविआच्या जागावाटपावर भाष्य करण्यास नकार : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील, याबाबत भाष्य करण्यास दानवे यांनी नकार दिला. हा अधिकार पक्षांच्या नेत्यांचा आहे. ते जागा वाटपाचा निर्णय घेतील, असं अंबादास दानवे त्यांनी सांगितलं.

‘शासन आपल्या दारी, जनता चकरा मारी’ : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य सरकार वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवत असताना आपल्याला जनता दरबार घेण्याची गरज का भासली? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले, की "‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून लोकांना निर्णय मिळत नाहीत. लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. चार-पाच वर्ष साधे दाखल्यांचे आणि अन्य प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ नसून ‘जनता शासनाच्या दारी’ फेरफटके मारत आहेत. शासन काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भूसंपादनाचे पैसे लोकांना मिळत नाहीत. साधे प्रवेशपत्रासाठी दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सरकार कुणाच्या दारी असा प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून जनता दरबार घेत आहोत. शिवसेनेची ही भूमिका आहे".

  • पालघरचा खासदार शिवसेनेचाच : "पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून तेथे शिवसेनेचाच खासदार होईल", असा आत्मविश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर "आधुनिकीकरण करताना मच्छीमार किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर तो अन्याय सहन केला जाणार नाही", असा इशारा त्यांनी दिला.

वाढवण बंदराबाबत स्थानिकांच्या भूमिकेशी सहमत : पुढे दानवे म्हणाले, " वाढवण बंदराबाबत स्थानिक नागरिकांची जी भूमिका आहे, तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मेट्रो प्रकल्प, मुंबई-वडोदरा महामार्ग तसेच अन्य प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत असून त्याविरुद्धही आम्ही आवाज उठवू. विकासाच्याबरोबर आम्ही आहोत. महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर या प्रकल्पाच्या नावाखाली कुणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन केला जाणार नाही", असं अंबादास दानवे यांनी ठणकावलं.

जनता दरबारात विविध प्रश्नांची चर्चा : अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात पालघर तालुक्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादनातील जमिनीच्या दरातील तफावतीबद्दल तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाढवण बंदराचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. दानवे यांनी काही प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. तर काही प्रकरणात अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

हेही वाचा:

  1. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण; मात्र दहा टक्के मुंबईकरांनी दिला सर्वेक्षणासाठी नकार
  2. 'महाविकास आघाडी'चे 'इंडिया आघाडी' सारखं होऊ नये, मविआत किमान समान कार्यक्रम - प्रकाश आंबेडकर
  3. जागा वाटप ही प्राथमिकता नसून, देशात भाजपाचा पराभव हीच आमची प्राथमिकता : संजय राऊत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.