ETV Bharat / state

पुणे जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात? अल्पवयीन मुलाने केला खून; दोघांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 4:30 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

A minor killed his friend : पुणे जिल्हा पुन्हा एकाद हादरला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मित्रानेच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पिंपरी चिंचवड /पुणे : A minor killed his friend : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने त्याचा मित्र असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर आरोपीने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना काल सोमवार (दि. 26 फेब्रुवारी) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.

डोक्यात दगड घालून हत्या : चाकण परिसरात रात्रीच्या सुमारास तीन अल्पवयीन मुलं दारू पीत बसले होते. यातील दोघं हे अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. दारू पीत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपीसोबत असलेल्या मुलाला हत्या झालेल्या मुलाने कानाखाली लगावली. या गोष्टीचा राग आल्याने त्यांच्यात वाद झाले. हा वाद टोकाला गेल्याने 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराने डोक्यात दगड घालून त्याच्या मित्राची हत्या केली.

अल्पवयीन मुलांवर पाच ते सहा गुन्हे दाखल : घटना घडली तेव्हा त्याचे चित्रीकरण तिसऱ्याने मोबाईलमध्ये केलं. आरोपीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामला स्टोरीवर ठेवला. हा व्हिडिओ नंतर सोशल मिडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी याची दखल घेत तातडीने तपास करत आरोपीचा शोध घेऊन दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर खुनाचे तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांवर पाच ते सहा गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अशी माहिती समोर आली.

मुलांच्या हालचालीकडं कटाक्षाने लक्ष देण्याची गरज : अल्पवयीन तरुणांच्याकडून अशा घटना घडत असतील तर हे पालकांसाठी चिंताजनक आहे. सध्याच्या जीवन शैलीत मुलांवर लक्ष देण्यात कुठंतरी पालक कमी पडत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर अशा घटना होण्यामागे सोशल माध्यमही तितकंच जबाबदार आहेत. यावर अंकुश ठेवायचा असेल तर पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालीकडं कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे अशी भावना येथील पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

1 आदिवासी बांधवांची होळी अंधारात गेल्यास सरकार जबाबदार; यशोमती ठाकूर यांचा विधानसभेत हल्लाबोल

2 "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी कार्यप्रणाली मिळतीजुळती, म्हणून..."; अजित पवारांचं जनतेला पत्र

3 मराठा आरक्षण आंदोलन : देवेंद्र फडणवीस यांना राज्य बेचिराख करायचं होतं, मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.