ETV Bharat / politics

गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेनं का चुकवावी - सुप्रिया सुळे यांचा सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 5:04 PM IST

supriya sule critisized deputy cm devendra fadnavis over shivsena thackeray group leader abhishek ghosalkar shot dead
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

Supriya Sule On Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर विरोधकांकडून महायुती सरकारला आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे. तसंच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थे बाबत प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबई Supriya Sule On Devendra Fadnavis : दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

गृहमंत्र्यांचं स्वतःच्या खात्याकडं अजिबात लक्ष नाही : यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, "मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मीडियावर लाईव्ह सुरू असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ आहे. एकीकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचं समोर येत आहे. तर दुसरीकडं अशा पद्धतीनं गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरू झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून पडताना दिसत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्र्यांचे स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेनं का चुकवावी?", असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.


अशा प्रकरणात गृहमंत्री काही करू शकत नाहीत : याप्रकरणी प्रतिक्रिया देत राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "विनोद घोसाळकर (अभिषेक घोसाळकर यांचे वडील) हे अनेक वर्ष आमचे सहकारी होते. कालच्या घटनेविषयी ऐकून वाईट वाटलं. मात्र, अशा प्रकरणात गृहमंत्री आणि पोलीस तरी काय करणार? तसंच बंदूक परवान्याबाबत नियम कठोर करणं गरजेचं आहे. कारण, प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाहीत. तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलात, नातेवाईक घरात घेऊन बसलात यात गृहमंत्री काय करु शकतात", असं म्हणत भुजबळ यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, पण ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी जुने वाद विसरून आता नवीन वर्षात नवीन प्रवास सुरू करत असल्याची घोषणा केली. मात्र, तीन मिनिटांचं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिस हा अचानक फेसबुक लाईव्हमधून उठून गेला आणि नंतर चौथ्या मिनिटाला मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली, असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्व वैमन्यस्यातून, विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
  2. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!
  3. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण: आरोपी मॉरिसवर आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.