ETV Bharat / politics

"अमरावतीकरांनो माफ करा, पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली", असं का म्हणाले शरद पवार? - Sharad Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 4:17 PM IST

Sharad Pawar says sorry people of Amravati I made a mistake five years ago
शरद पवार

Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज (22 एप्रिल) अमरावतीत शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली.

शरद पवार अमरावती सभा

अमरावती Amravati Lok Sabha Constituency : खरंतर अनेक दिवसांपासून अमरावतीत येऊन अमरावतीकरांची मला माफी मागायची होती. आज मला माफी मागण्याची संधी मिळालीय. पाच वर्षांपूर्वी मी ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून सर्वांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आवाहन केलं होतं. माझ्यामुळं तुम्ही देखील त्या उमेदवाराला मतदान केलं. तो उमेदवार निवडून आल्यावर मात्र आमचा राहिला नाही. माझ्यामुळं झालेली ती मोठी चूक होती. यामुळंच आता अमरावतीकरांची मी माफी मागतोय. आता महायुतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना या मतदारसंघातून निवडून देऊन मला माफ करावं, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमरावतीत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना केली आहे.

मोदींना पुतीन व्हायचंय : उत्तर प्रदेशातील एका नेत्यानं आपल्या संविधानात बदल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्याचं विधान केलं. मोदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान बदलायचंय. भारतात रशियाच्या पुतीन प्रमाणे मोदींना सत्ता चालवायची आहे. मात्र, यावेळी जनता मोदींना त्यांची योग्य जागा दाखवेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढं ते म्हणाले की, "आज भाजपात अनेक वयोवृद्ध नेते आहेत. मात्र, अशा ज्येष्ठ मंडळींना मोदींसमोर मान खाली वाकून उभं रहावं लागतं. मोदींशिवाय भाजपातील इतर कुठल्याही नेत्याला कुठंही काही बोलण्याची मुभा नाही. सभागृहात देखील मोदींशिवाय कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. देशातील प्रत्येक पंतप्रधानानं देश मजबूत कसा होईल याबाबत जनतेशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी मात्र केवळ देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यापलीकडं काहीही केलं नाही", अशी टीका त्यांनी केली.

मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान : "गडचिरोलीत 70 टक्के मतदान, तर नागपूरमध्ये केवळ 54 टक्के मतदान झालं. हे चित्र योग्य नाही. अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात मतदानाचा टक्का हा मोठ्या प्रमाणात वाढायला हवा. देशातील सत्ता बदलासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकानं मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावं", असं आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केलं. महाविकास आघाडीच्या मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे, काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अनिल देशमुख ,डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. रावेर लोकसभा मतदारसंघात असंतोष, शरद पवारांची कार्यकर्त्यांशी चर्चा - Lok Sabha Election 2024
  2. "...तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही", शरद पवारांचा हल्लाबोल - Sharad Pawar News
  3. 'आमच्या आयुष्यातील दहा वर्षे का वाया घालवली', फडणवीसांना उत्तमराव जाणकर यांचा खडा सवाल, शरद पवारांना पाठिंबा जाहीर - Uttamrao Jankar support NCP
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.