ETV Bharat / politics

राज ठाकरेंच्या इंजिनचा 'भोंगा' महायुतीसाठी फायद्याचा? जाणून घ्या इतिहास - Raj Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 8:03 PM IST

Raj Thackeray On PM Narendra Modi
राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. तर दुसरीकडं २००९ चा अपवाद सोडला तर त्यानंतर राज्यात मनसेला सातत्यानं उतरती कळा लागलीय.

मुंबई Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) फक्त मोदी यांच्यासाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी माघार घेतली होती. आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा ते या निवडणुकीच्या रिंगणापासून बाहेर आहेत. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी बरेच प्रयत्न भाजपा, शिंदे गटाकडून करण्यात आले. राज ठाकरे यांच्यासाठी लोकसभेच्या दोन जागाही राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती होती. परंतु, राज ठाकरे यांनी स्वतःच इंजिन चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिल्यानं त्यांनी महायुतीत सामील होण्याऐवजी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना : 'मराठी अस्मिता, मराठी बाणा' या मुद्द्यांवर २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. परंतु २००९ चा अपवाद सोडला तर त्यानंतर राज्यात मनसेला सातत्यानं उतरती कळा लागलीय. यंदा मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्यामागे राज ठाकरे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काही गणित आखली असली तरीही, विधानसभा निवडणुकीत यंदा तरी आघाडी घेणं त्यांना तितकं सोपं नाही. मनसेच्या आतापर्यंतच्या एकंदरीत प्रवासाचा हा लेखाजोखा.



मनसेचा आलेख उतरत गेला : २००६ साली अस्तित्वात आलेल्या मनसेने अवघ्या तीन वर्षात राज्यात कमालीची पकड निर्माण केलीय. पक्ष स्थापनेनंतर २००९ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. याचं कारण त्यानंतर मनसेला उतरती कळाच लागली. मनसेने २००९ लोकसभा निवडणुकीत राज्यात ११ जागा लढवल्या. परंतु, त्यांना एकाही जागी विजय संपादन करता आला नाही. या निवडणुकीत त्यांना १५,०३,११८ मते मिळाली आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ही ४.१ टक्के होती. लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ २००९ विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यात १४३ जागी उमेदवार उभे केले आणि त्यांचे १३ आमदार निवडून आले. या निवडणुकीत त्यांना २५,८५,५९७ मते मिळाली आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ५.७१ टक्के होती.

लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी : २०१४ लोकसभा निवडणुकीत मनसेने १० ठिकाणी उमेदवार उभे केले. परंतु त्यांना एकाही जागी विजय प्राप्त झाला नाही. या निवडणुकीत त्यांना ७,०८,११८ मते मिळाली आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ही १.५ टक्के इतकी होती. याचाच अर्थ लोकसभा २००९ मध्ये मिळालेल्या ४.१ टक्क्यावरून २०१४ मध्ये मनसेच्या मतांची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा जास्त मतांनी खाली आली.

मतांच्या टक्केवारीत घट : २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यात २१९ ठिकाणी उमेदवार उभे केले. परंतु, त्यांना फक्त एकाच जागी विजय प्राप्त झाला. या निवडणुकीत मनसेला १६,६५,०३३ मते मिळाली आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ३.२ टक्के इतकी होती. याचाच अर्थ २००९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीत मनसेच्या मतांच्या टक्केवारीत २.६९ टक्क्यांनी घट झाली. २००९ आणि २०१४ चा लोकसभेतील पराभव पाहता मनसेने २०१९ साली लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यात १०१ जागी उमेदवार उभे केले. परंतु, २०१४ प्रमाणे या निवडणुकीत सुद्धा त्यांचा एकच उमेदवार निवडून आला. मनसेला १२,४२,१३५ मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी २.२५ टक्के होती. यामध्ये सुद्धा २०१४ च्या तुलनेत घट झाली.



मुंबईत मनसेचा महायुतीला फायदा : मुंबईत मनसेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्याचं नेहमी सांगितलं जातंय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत ४,६२,००० मते मिळाली होती. यामध्ये मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात १,२३,००० इतकी सर्वाधिक मते मिळाली होती. त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघामध्ये ९६,४९८ मते मिळाली होती. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात ६८,२४४ मते मिळाली होती. यंदा मुंबईमध्ये महायुतीला मनसेच्या मतांचा फायदा नक्कीच होणार आहे. यंदा मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपाकडून मिहीर कोटेचा या मराठी उमेदवारास उमेदवारी दिली गेली असल्याकारणानं या मतदारसंघात मनसेच्या मतांचा फायदा मिहीर कोटेचा यांना होऊ शकतो.

मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर : मुंबई दक्षिण मध्य मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली गेली. त्यांची लढत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासोबत होत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या या लढाईत मनसेचे मते निर्णायक ठरू शकतात. तसेच उत्तर मुंबईमध्ये भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मनसेच्या मतांचा फायदा होईल. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून राज ठाकरे यांनी मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी, लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडूनच मनसेच्या विरोधात उमेदवार दिले गेल्यास त्याचा फटका मनसेला बसू शकतो.



महाराष्ट्र राजकारणात ठाकरे आडनाव महत्त्वाचं : मनसे पक्षाची आतापर्यंतची घोडदौड आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची वेळोवेळी बदललेली भूमिका याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर सांगतात की, मनसेला २००९ नंतर उतरती कळा लागलेली आहे. हे सांगायला कुणा विश्लेषकाची गरज नाही तर मतांच्या टक्केवारी वरून ते दिसून येते. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणं राज ठाकरे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केलाय. राज ठाकरे यांचे लक्ष २०२४ विधानसभा निवडणुकीवर आहे. अशामध्ये महायुतीला सुद्धा ठाकरे घराण्यातील राज ठाकरे हे महत्त्वाचे आहेत. कारण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील ठाकरे महायुतीसोबत असणं फार गरजेचं आहे. अशात राज ठाकरे यांची साथ महायुतीला लाखमोलाची ठरणारी आहे.

महायुतीत येण्याचं दिलं आमंत्रण : उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्यासाठी नारायण राणे, राज ठाकरे असे बलाढ्य नेते हवेत. याच कारणानं भाजपानं राज ठाकरे यांना महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं. परंतु चिन्हावरून घोडं अडल्यानं राज ठाकरे महायुतीत सामील न होता त्यांनी मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला थोड्याफार प्रमाणात नक्कीच होईल. परंतु, त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची मर्जी महायुतीत विशेष करून भाजपासाठी सुद्धा जास्त महत्त्वाची नसणार आहे. कारण तेव्हाही भाजपाच्याच नेत्यांची चलती असणार आहे. या कारणानं राज ठाकरे यांनी आता जी भूमिका घेतली ती त्यांच्या पक्षासाठी पुढे किती महत्त्वाची असेल, हा येणारा काळच ठरवणार आहे.

हेही वाचा -

  1. आदित्य ठाकरे 'ईटीव्ही'शी संवाद साधणार अन् तेवढ्यात स्टेज कोसळलं; किरकोळ दुखापत - aaditya thackeray stage collapsed
  2. "अमरावतीकरांनो माफ करा, पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली", असं का म्हणाले शरद पवार? - Sharad Pawar
  3. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आणले कुठून? ॲड. यशोमती ठाकूरांचा नवनीत राणांना सवाल - Adv Yashomati Thakur
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.