ETV Bharat / politics

तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही याची खात्री द्या; प्रकाश आंबेडकरांचं आव्हाड यांना प्रत्युत्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 3:37 PM IST

Prakash Ambedkar On Jitendra Awhad : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआमधील पक्षांनी आपली सर्व ताकद लावली आहे. वंचितलाही सोबत घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्राद्वारे प्रकाश आंबेडकरांना भावनिक साद घातली होती. तर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रानंतर आंबेडकर यांनीही पत्राद्वारे पलटवार केलाय.

Prakash Ambedkar On Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर

मुंबई Prakash Ambedkar On Jitendra Awhad : राष्टवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिल्यानंतर आता ॲड. आंबेडकर यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय. आपण लिहिलेलं पत्र हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेलं नसून व्यक्तिगत लिहिलं आहे, असं आम्ही समजतो. मात्र, व्यक्तिगत आणि राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे, असं आम्ही नेहमी मानतो असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. संविधान वाचविणं ही आपण जी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे, असं आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय.


संविधान वाचवणं ही आमची जबाबदारीच : आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपाबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढं राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केलाय. त्यामुळं संविधान वाचविणं ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे.

मौनातून दर्शविला होता विरोध : आपल्या परीनं आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणं शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळं पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आलं की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावं लागेल की, निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.

संविधान वाचविणं ही आपण जी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे, त्याचबरोबर निवडणुकीनंतर तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही. याची खात्री द्यावी. - प्रकाश आंबेडकर, वंचितचे नेते


तुमच्या पक्षाची खात्री काय : आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतलं आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड-उघड असं लिहून देण्यास नकार दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बघितलं तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचं असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की, तुम्ही निवडणूक झाल्यानंतर भाजपाबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर टाकलं आहे का? हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिलं नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचं ही पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपलं पत्र जर सोशल मीडियावर गेलं तर आमचं पत्रही सोशल मीडियावर जाईल, असा इशाराही आंबेडकर यांनी दिल्यानं, आता राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये जागावाटपापूर्वीच संघर्ष पहायला मिळतो आहे.

हेही वाचा -

  1. " निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींचा 'खरा चेहरा'..." इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड करण्यातील दिरंगाईवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
  2. "लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही, पण..."; सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
  3. "ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो", औद्योगिक मेळाव्यावरून शिवानी वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.