ETV Bharat / politics

हितेंद्र ठाकूर यांना पाच कोटींची नव्हे, तर एक रुपयाची मानहानीची नोटीस- पालकमंत्री रवींद्र चव्हाण - Ravindra Chavan Vs Hitendra Thakur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 8:13 AM IST

Defamation Notice To Hitendra Thakur : लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी असून ते त्यासाठी हॉटेलमध्ये कॅान्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. यावरुनच आता हितेंद्र ठाकूर यांना एक रुपयाची मानहानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी रविवारी दिलीय.

One rupee defamation notice issued to Hitendra Thakur information given by Guardian Minister Ravindra Chavan
हितेंद्र ठाकूर आणि रवींद्र चव्हाण (ETV Bharat)

पालकमंत्री रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद (reporter)

पालघर Defamation Notice To Hitendra Thakur : पालघर लोकसभा मतदारसंघात उद्योजक, डॉक्टर, वकील तसंच अन्य समाज घटकांच्या बैठका घेतल्या. तिथं कुठंही खंडणीचा किंवा पैशाचा मुद्दा उपस्थित झाला नाही. असं असताना एक ज्येष्ठ आमदार शंभर कोटीचा आरोप कोणतेही पुरावे नसताना करत असेल, तर ते चुकीचं आणि दुर्दैवी आहे. आमदार ठाकूर यांना एक रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पत्रकार परिषदेदरम्यान डॉ. हेमंत सावरा यांचा पालघर लोकसभा मतदारसंघातील विजय निश्चित असल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला. तसंच माध्यमांशी बोलताना त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून तेथे तयार झालेलं वातावरण, सभा आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद याचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात घसरलेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेता पालघर लोकसभा मतदारसंघात जास्त मतदान व्हावं, यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. मतदान सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दीड तासात किमान दोनशे मतदान झालं, तर पुढं मतदानाची टक्केवारी 55-60 टक्केच्या आसपास होऊ शकते, असं निदर्शनास आणून त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या मतदारांना सकाळी सकाळीच बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत कसे येतील हे पाहण्याची जबाबदारी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुराव्याशिवाय आरोप, मानहानीचा दावा : " लोकसभा निवडणूक सकारात्मक पद्धतीनं घ्यावी, तिला नकारात्मक वातावरण मिळू नये, असा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी कोणावरही एका शब्दानं कोणतीही टीका केली नाही. मात्र, असं असताना माझ्यावर पुराव्यांशिवाय खंडणीचे आरोप का केले गेले? हे मला समजत नाही. आमच्या जिल्हाध्यक्षानं त्यांना तुमच्याकडं काही पुरावे असतील तर ते आणून द्या, असं सांगत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच, एका कार्यकर्त्याकडून पाच कोटी रुपयांची अशीच नोटीस पाठवण्यात आली असली तरी, आम्ही मात्र त्यांच्याविरोधात (हितेंद्र ठाकूर) एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करू," असं रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मोदींमुळं पायाभूत सुविधांना साडेबारा लाख कोटींचा निधी : पुढं ते म्हणाले की, "पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सावरा यांना निवडून देणं म्हणजे मोदींचे हात बळकट करण्यासारखं आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित असल्यामुळं महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी निधी मिळाला यासाठी आम्ही प्रयत्न करू. जेव्हा मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा पायाभूत सुविधांसाठीचं अंदाजपत्रक सुमारे एक लाख कोटी रुपये होतं. परंतु, आता ते साडेबारा लाख कोटी रुपये झालंय. त्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळं मोठमोठी विकास कामं झाली. ही कामं आणखी गतीनं व्हायची असतील, तर डॉ. सावरा यांना आपल्याला लोकसभा निवडणुकीत विजयी करावं लागेल."

पालघरसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी : "मी इतरांवर टीका आणि आरोप करण्यात कधीच धन्यता मानली नाही. मी काय काम केलं हे सांगण्यावर माझा भर होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. माझ्याकडं असलेल्या खात्याच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यासाठी मी हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची तसंच अन्य कामे करून दिली. या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारापासून सभांना सुरुवात झाली. योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेनं या मतदारसंघातील प्रचार संपला. त्याचा डॉ. सावरा यांना निश्चित फायदा होणार", असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.


हेही वाचा -

  1. "निवडून आल्यावर विरोधात राहीन, पण जातीयवादी शक्तींबरोबर जाणार नाही", हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय - Hitendra Thakur Determination
  2. "पुरावे सिद्ध करा अन्यथा..." भाजपानं हितेंद्र ठाकूर यांना 'हा' दिला इशारा - Hitendra Thakur
  3. "पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण निवडणुकीसाठी ...", हितेंद्र ठाकूर यांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप - Hitendra Thakur
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.