Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता, 'अशी' घ्या काळजी
अमरावती : अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात 15 ते 18 मार्च दरम्यान काही भागात तुरळक आणि मध्यम तर काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. अनेक ठिकाणी तर गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती विभागाला बसणार असून; 16 आणि 17 मार्चला गारपीट होण्याची शक्यता आहे. 15 मार्चपासून विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असून 27 मार्चपर्यंत हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा हा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि फळ पिकाची काढणी लवकर करून घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी केले आहे. परिपक्व झालेले कांदा पीक काढून घ्यावे आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे देखील डॉ. सचिन मुंढे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले आहे. या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. ज्या शेतकऱ्यांनी गहू काढला आहे त्यांनी तो तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी असे देखील डॉ. सचिन मुंढे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. 15 ते 8 मार्च दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनांसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे यामुळे शेतात काम करत असताना मे गर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांना गोठ्यांमध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी, असे देखील डॉ. सचिन मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.