Maratha Reservation : दबावापोटी सरकारकडून आरक्षणाच्या निर्णयास विलंब - बच्चू कडू
Published : Nov 1, 2023, 4:11 PM IST
|Updated : Nov 1, 2023, 5:15 PM IST
बुलडाणा Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडं हा मुद्दा चिघळत चालला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार कोणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेण्यास दिरंगाई करत आहे. मात्र आरक्षण न दिल्यासं गंभीर परिणाम होतील, असं त्यांनी म्हटलंय. "मराठ्यांना आरक्षण द्यायला एवढा वेळ लागू नये. मराठा हा सर्वसमावेशक समाज आहे. हा समाज काही जातीपुरता मर्यादित नाही. मराठा तेली, मराठा माळी इत्यादी सर्व मराठाच आहेत. त्यामुळं काहींना ओबीसीतून आरक्षण मिळतंय, तर काहींना मिळत नाही. कोणाच्याही दबावाखाली सरकारनं येऊ नये, असं कडू यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात यावं. यामध्ये कोणत्याही पक्षानं राजकारण करू नये. काही लोक जाणीवपूर्वक मतांचं राजकारण करत आहेत. मग ते आपल्या जवळचे असो, वा दूरचे. मतांचं राजकारण करत असाल तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं कडू यांनी म्हटलं आहे. तसंच कोणाच्याही घरांची जाळपोळ करणं योग्य नाही. जाळपोळ करणारे आंदोलक कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय.