यवतमाळ: कॉपीमुक्त योजना राबवून सपशेल अयशस्वी झाल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल व पुनकाबाई आश्रम शाळा हे दोन केंद्र समाविष्ठ आहे. दोन्ही केंद्रांवर मंगळवारी परीक्षेला सुरुवात झाली. मुकुटबन येथील दोन्ही परीक्षा केंद्रावर बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना अर्ध्या तासातच आश्रम शाळेतील खोली नंबर आठमधून इंग्रजी पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे चार पेज सोशल मीडिया असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.
केंद्रपमुखासह दोघांवर गुन्हे दाखल: पेपर फुटीच्या या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी मोहम्मद याकूब मोहम्मद हमजा यांनी याप्रकरणी मुकूटबन पोलिसात तक्रार दिली. त्यावरून केंद्रपमुखासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार, पर्यवेक्षक प्रेमेंदर येलमावार व अन्य फोटो काढणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्घ कलम 188 भादंवि 5 नुसार गुन्हे दाखल केले. घटनेचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान, प्रकाश गोरलेवार आदी करीत आहे.
3,195 मुख्य केंद्रावर परिक्षा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर तारखेनुसार बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परिक्षेसाठी एकूण 14,54,293 विद्यार्थी बसले आहे. परिक्षेसाठी राज्यात तब्बल 3,195 मुख्य केंद्रावर परिक्षा होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
एकूण परिक्षार्थींची संख्या: बारावीच्या बोर्ड परिक्षसाठी 7,92,780 विद्यार्थी 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. तसेच यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स (ITI) शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती: परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.