ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: ठाणेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या घरात, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

author img

By

Published : Apr 18, 2023, 9:33 AM IST

corona patients
कोरोना रुग्ण संख्या

कोरोनाच्या सुरवातीला राज्यातील हॉटस्पॉट अशी ओळख बनलेल्या ठाणे जिल्हा हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत जानेवारी २०२३ मध्ये दिसून येत आले. मात्र मार्चच्या गेल्या २० दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून ती हजाराच्या घरात गेली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभाग पुन्हा सक्रिय होऊन रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करताना दिसून येत आहे.

ठाणे : मार्च २०२० साली कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर सर्वप्रथम पुणे, मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका क्षेत्रात १३ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर १४ मार्च २०२० रोजी कल्याण आणि नवीमुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला. मात्र जसा २०२० सालचा एप्रिल महिना उजाडला तसा, या आजाराचा फैलाव अधिक तीव्रतेने जिल्हात होऊ लागला. आता पुन्हा मार्च २०२३ मधील एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या एक हजाराच्या घरात जाऊन आज दिवसभरात जिल्ह्यात १०० कोरोना रुग्ण आढळून आले आहे.


दुसऱ्या लाटेत हजारो कोवीड रुग्ण: जिल्हात कोविडची तिसरी लाट आल्याचे पाहायला मिळाली. त्यापैकी पहिली लाट आणि दुसरी लाट अतिशय भयंकर होती. कोवीडच्या या दोन्ही लाटांमध्ये जिल्ह्यात दररोज हजारो रुग्ण आढळून येते होते. एकाच दिवशी आढळून आलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये पहिल्या लाटेमध्ये दररोज ५०० तर दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा तब्बल २ हजारांवर गेला होता. तर तिसऱ्या लाटेत रुग्णवाढ भरमसाठ असूनही कोरोनाची तितकीशी परिणामकारकता दिसून आली नाही. आतापर्यत जिल्ह्यात ७ लाख ५० हजार ३६६ नागरीकांना कोरोनाची बाधा झाली. तर ७ लाख ३८ हजार १५४ रुग्ण बरे झाले आहे.



‘डॉक्टर आर्मीने’ दिली मोलाची साथ: शासनाची आरोग्य यंत्रणा तोकडी पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर, तत्कालीन पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज संस्थाच्या हद्दीतील खासगी डॉक्टरांना मदतीसाठी साद घातली गेली. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि डॉक्टर आर्मीसह जिल्ह्यातील विविध डॉक्टरांच्या संघटनासह शेकडो सामाजिक संघटनानी त्यावेळी कठीण परिस्थितीत मोलाची साथ दिली. त्याच्याच जोडीला जिल्ह्यात अनेक जम्बो कोविड सेंटर आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उभारल्या. ज्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांना तेवढ्याच ताकदीने तोंड दिलेले पाहायला मिळाले.



सर्वाधिक रुग्ण नवी मुबंई महापालिका हद्दीत: आज दिवसभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पाहता सर्वाधिक रुग्ण नवी मुबंई महापालिका हद्दीत ४३ रुग्ण आढळून आले तर, ठाणे महापालिका हद्दीत ४२ रुग्ण, तसेच मीरा भाईंदर महापालिका हद्दीत ३ रुग्ण, भिवंडी आणि उल्हासनगर महापालीका हद्दीत प्रत्येकी २ रुग्ण, तसेच बदलापूर नगरपरिषद हद्दीत ४ तर ग्रामीण भागात ४ असे दिवसभरात १०० रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



सर्वाधिक मृत्यू या क्षेत्रात: कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून आजपर्यत ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आजपर्यत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात झाला असून, २ हजार ९६२ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल ठाणे महापालिका हद्दीत २ हजार १७२, तर नवीमुंबई महापालीका हद्दीत २ हजार ०५७ रुग्णांचा मृत्यू, मीरा भाईंदर हद्दीत १ हजार ४०७, उल्हासनगर महापालीका हद्दीत ६६६, भिवंडी निजामपूर महापालीका हद्दीत ४८७, अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत ५८०, तर सर्वात कमी ३८९ रुग्णांचा कुळगाव - बदलापूर नगरपरिषद हद्दीत मृत्यूची नोंद झाली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यातील ग्रामीण भागातही १ हजार २५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागात करण्यात आली आहे.


हेही वाचा: Corona Update राज्यात दीड महिन्यात कोरोनाचे १८ हजार नवे रुग्ण ५८ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.