ETV Bharat / state

कोरोना संकटामुळे विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत मोठी घट, देखभालीसाठी साडे पाच कोटींचा आला खर्च

author img

By

Published : Sep 2, 2021, 5:15 PM IST

पंढरपूरमधील विठूरायाच्या मंदिरातील दान पेटीत कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून मोठी घट झाली आहे. मंदिर समितीच्या उत्पन्नात गेल्या वर्षभरात सहा कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्मचाऱ्याच्या वेतानापोटी 4 कोटी 50 लाख अंदाजे, तर 71 लाख रुपयांची विजेचे बिल मंदिर समितीला देण्यात आले आहे. अशी माहिती, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

विठ्ठल-रुक्मीणी
विठ्ठल-रुक्मीणी

सोलापूर (पंढरपूर) - राज्यातील कष्टकऱ्यांचा व गोरगरिबांचा कैवारी विठूरायाच्या मंदिरातील दानपेटीत कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मंदिर समितीच्या उत्पन्नात गेल्या वर्षभरात सहा कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्मचाऱ्याच्या वेतानापोटी 4 कोटी 50 लाख अंदाजे, तर 71 लाख रुपयांची विजेचे बिल मंदिर समितीला देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षापासून विठुरायाचे मंदिर बंद आहे. त्यामुळे विठूरायाच्या दान पेटीत ठणठणाट आहे. त्यातही कर्मचाऱ्याचे वेतन व वीज बिलापोटी 5 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च मंदिर समितीने कोरोना काळात केला असल्याची माहिती, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

माहिती देताना कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी

'विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात 60 कोटी रुपयांची घट'

गेल्या दीड वर्षापासून विठुरायाचे मंदिर भाविकांविना कधी चालू-बंद अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागत आहे. याचा परिणाम विठुरायाच्या उत्पन्नावरही झाला आहे. तब्बल 50 ते 60 कोटी रुपयांची तफावत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिसून आली आहे. त्यातून विठ्ठल मंदिरासह इतरही सेवा सुविधांमध्ये मंदिर समितीकडून खर्च केला जातो. गेल्या दीड वर्षापासून चार वाऱ्याही साधेपणाने केल्या गेल्या. त्यातून विठ्ठल मंदिराला कोट्यावधीचे उत्पन्न दानपेटीत येत असते. मंदिर समितीला भाविकांच्या दानपेटीतील इतर उत्पन्नातून सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. विठ्ठल मंदिर बंद असल्याचा परिणाम विठूरायाच्या दान पेटीत झाल्याचे दिसून आले आहे.

'विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी साडेचार कोटी रुपये खर्च'

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. राज्यसरकारने आखून दिलेल्या नियमानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर कामकाज चालते. विठ्ठल मंदिरात अडीचशे ते तीनशे कर्मचारी विठुरायाला सेवा देतात. त्यांच्या वेतनापोटी मंदिर समितीला महिन्याकाठी पस्तीस लाख रुपये घ्यावे लागतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून मंदिर भाविकांसाठी चालू बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात तफावत आढळून येते. कोरोना काळात मंदिर समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, भाविकांच्या देणगीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कारभार चालत असतो.

'विठुरायाच्या मंदिराला दीड वर्षात 71 लाख रुपयांचे वीज बिल'

गेल्या दीड वर्षापासून कोरोना अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गेल्या दीड वर्षापासून विठ्ठल मंदिर, तुकाराम भवन, भक्त निवास देखरेख करण्यासाठी मंदिर समितीला कोट्यावधी रुपये घ्यावे लागतात. त्यातच विठ्ठल मंदिर समितीकडून गेल्या दीड वर्षापासून 71 लाख रुपयांची वीज बिल भरण्यात आले आहे. उत्पन्नही जेमतेम सहा कोटीं रुपये जमा झाले आहे. लॉकडाउन होण्याच्या आधी मंदिराला दर महिना पंधरा ते सोळा लाख रुपये विजेचे बिल देण्यात येत होते. त्याचप्रमाणे मंदिराचे उत्पन्नही महिन्याला सहा कोटींच्या घरात होते. मात्र, लॉकडाउनच्या काळात मंदिराच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. मात्र, विजेचे बिल प्रति महिना सहा लाख रुपये इतके येत आहे. विठुरायाच्या देखभालीचा कोट्यावधी रुपयांचा खर्च आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.