ETV Bharat / state

...म्हणून होतोय अमित शाह यांचा तिळपापड; खासदार विनायक राऊत यांचे उत्तर

author img

By

Published : Feb 8, 2021, 9:42 PM IST

mp vinayak raut
खासदार विनायक राऊत

राज्यात भाजपला आम्ही तिन्ही पक्ष मिळून भुईसपाट करणार असल्याचे विधानही त्यांनी यावेळी केले. तर ऑपरेशन लोटसला महाराष्ट्रातील आमदार बळी पडणार नाहीत, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.

सिंधुदुर्ग - भाजपने एनडीएमध्ये असलेल्या सगळ्या घटक पक्षांना संपवण्याचे आणि चिरडून टाकण्याचं काम केलं. त्याला फक्त शह देण्याचं काम केवळ शिवसेनेने केलं. त्यामुळे अमित शाहांचा हा तिळपापड होत आहे. त्यामुळे त्यांचा हा उद्रेक होणं साहजिकच आहे. मात्र शिवसेना त्यांच्या या विधानांना बिलकुल किंमत देत नाही, असे स्पष्ट मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मांडले आहे.

राज्यात भाजपला आम्ही तिन्ही पक्ष मिळून भुईसपाट करणार असल्याचे विधानही त्यांनी यावेळी केले. तर ऑपरेशन लोटसला महाराष्ट्रातील आमदार बळी पडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती तुटली आणि सत्तापालट झाला. यानंतर राज्यात प्रथमच आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. याला उत्तर देताना विनायक राऊत बोलत होते.

प्रतिनिधी विवेक ताम्हणकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत साधलेला संवाद

ती खोली नव्हे आमच्या दैवताचे मंदिर आहे

अमित शाह ज्या बंद खोलीमध्ये चर्चा झाली म्हणतायत ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल मात्र आमच्यासाठी आणि शिवसैनिकांसाठी ते आमच्या दैवताचं मंदिर आहे. याच मंदिरात यापूर्वी झालेल्या चर्चेचे अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी हे साक्षीदार आहेत. या मंदिरातून सगळ्यांच्या भल्याचेच संदेश दिलेले आहेत. दुर्दैवाने अमित शाह यांना सत्तेच्या मस्तीमध्ये ती खोली वाटते म्हणून त्याची ते निर्भत्सना करत असतील तर त्याचं पाप त्यांना भोगाव लागेल.

ऑपरेशन लोटसला महाराष्ट्रातील आमदार बळी पडणार नाहीत

ऑपरेशन लोटस म्हणजे करोडो रुपये ओतायचे आणि लोकप्रतिनिधींना मिंद बनवायचं हा एकमेव धंदा सध्या भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. त्याला महाराष्ट्रातला कोणताही आमदार बळी पडणार नाही. परंतु तीन चाकाची रिक्षा ही सर्वसामान्यांची असते. सामान्य लोकांचा ती आधार असते. या सामान्य माणसाच्या रिक्षेचे स्टिअरिंग उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे आणि ये विकासाची ही रिक्षा उत्तम प्रकारे चालवत आहेत. हे पाहून त्यांची जळफळाट होतेय त्याला नाईलाज आहे, असेही ते म्हणाले.

नारायण राणे यांनी सी वल्डच्या नावाखाली 1300 एकर जमीन हडप करण्याचा केला प्रयत्न

विकास कामांना शिवसेनेचा विरोध नाही. मात्र त्याच्या नावाखाली गोरगरीब जनतेला नडण्याच्या धोरणाला आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी सी वल्डच्या नावाखाली 1300 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याठिकाणी 300 एकरमध्ये प्रपोजल तयार करायला हवं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी कसे सांगितलं नाही. चिपी विमानतळाच्या चारी बाजूला पेंशीलने सूचना घालून 937 हेक्टर जमीन ही कमर्शिअल झोन म्हणून जाहीर केली होती. या लुबाडणुकीचा विरोध शिवसेनेने केला होता. आज हे विमानतळ सुरू होणार आहे, असेही राऊत म्हणाले.

नारायण राणे मुख्यमंत्री पदासाठी सवकलेला माणूस

महाराष्ट्र सरकारला धोका पोचविण्याचे काम केंद्र सरकारने कधीही करू नये आणि ते पाहिलसुद्धा मात्र कोणी त्याला बळी पडलेलं नाही. 1999 पासून नारायण राणे यांची अनेक भविष्य मी पाहिलेली आहेत. मुख्यमंत्री पदासाठी सवकलेला हा माणूस त्यांनी अनेक गैरप्रकार, निंदनीय प्रकार केलेले आहेत. परंतु हे सरकार जनतेचं सरकार आहे. नारायण राणे यांच्या भविष्यावाणीचा कोणताही परिणाम त्याच्यावर होणार नाही, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

भविष्यात भाजपला भुईसपाट करणार

अमित शाहा यांच्या दौऱ्याने फारसा फरक पडणार नाही. ऑपरेशन लोटस काही सक्सेस होणार नाही. राज्यात ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार काम करतय ते पाहता भविष्यात आम्ही भाजपला भुईसपाट करणार आहोत, असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.