ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांनी भाकीत करण्याचा नवा व्यवसाय सुरू केला असावा; शरद पवारांकडून खिल्ली

author img

By

Published : Nov 24, 2021, 9:15 PM IST

Updated : Nov 24, 2021, 10:09 PM IST

Sharad Pawar
शरद पवार

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता भाकीत व्यक्त करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पाटलांची खिल्ली उडवली. ते महाबळेश्वरमध्ये बोलत होते.

सातारा - चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता भाकीत व्यक्त करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पाटलांची खिल्ली उडवली. कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर पुढील पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
  • महाबळेश्वर येथे केले वक्तव्य -

महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीराच्या समारोपासाठी शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. शिबीराला जाण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.

  • विलीनीकरण न परवडणारे -

शरद पवार म्हणाले, राज्य परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. 1948 मध्ये राज्यातील पहिली एसटी रस्त्यावर धावली तेव्हापासून कर्मचारी यांचे पगार देण्यासाठी कधी अ‍ॅडव्हान्स घेण्याची वेळ महामंडळावर आली नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे कर्मचाऱयांच्या पगारासाठी 500 कोटी रूपयांचा राज्य सरकारकडून अ‍ॅडव्हान्स घेण्याची वेळ या महामंडळावर आली. कर्मचारी वर्गाने विलीनीकरणाची मागणी केली आहे. ही मागणी मान्य केली तर राज्य शासनावर मोठा आर्थिक भार पडणार आहे, याचा विचार राज्य शासनाने केला पाहीजे. महामंडळाचे कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी नाहीत. नोकरीसाठी अर्ज करताना त्यांनी राज्य शासनाकडे अर्ज केला नाही. परिवहन महामंडळाप्रमाणे आता राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखील मागणी केली आहे. अशा राज्यात 15 संस्था आहेत. त्याही अशीच मागणी करतील. याबाबत देखील विचार झाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

विरोधकांना एसटी आंदोलन पेटवण्याची संधी -

एसटीमध्ये आता कोणती संघटना अधिकृत आहे याचा निर्णय झाला पाहीजे. विलीगीकरणाचा करार कोणाबरोबर करायचा हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही. या कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे विरोधकांना देखील हे प्रकरण पेटवण्याची आयती संधी मिळाली आहे, अशी टिकाही शरद पवार यांनी केली. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही आघाडी करून लढवली नाही. सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहीले होते. काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्यावतीने निवडणूक लढवत होते. लोकशाहीत प्रत्येकाला स्वायत्ता आहे. त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्विकारला पाहीजे, असे शरद पवार एका उत्तरात म्हणाले.

Last Updated :Nov 24, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.