ETV Bharat / state

महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास - शरद पवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 5:27 PM IST

Updated : Dec 3, 2023, 6:43 PM IST

Sharad Pawar Reaction : आज जाहीर झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निकालांचा इंडिया आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. जो निकाल लागला आहे त्यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.

sharad pawar
खासदार शरद पवार

सातारा Sharad Pawar Reaction : तेलंगाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा इंडिया आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलीय. जो निकाल लागला आहे त्यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती, असं स्पष्ट करून महाराष्ट्रात मात्र भाजपाची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.



राजस्थानच्या जनतेचा मूड निकालात दिसला : सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राजस्थानमध्ये मागील पाच वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. परंतु, आता नवीन लोकांना संधी द्यायचा मूड राजस्थानच्या जनतेचा होता. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसत आहे.



तेलंगाणात राहुल गांधींचा करिष्मा: तेलंगणामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे ती त्यांच्याच हातात राहील, असं पहिल्यापासून दिसत होतं. परंतु, हैदराबादमध्ये राहुल गांधींची जी सभा झाली. त्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की, तेलंगणात परिवर्तन होईल आणि तशाच प्रकारचा ट्रेंड दिसतोय, असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं. या निकालात भाजपाला अनुकूल असा ट्रेंड दिसतोय, हे मान्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.



साताऱ्यातील उमेदवार निवडून आणणार : मोदींशिवाय पर्याय नाही, या अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाशी झालेल्या जवळीकीमुळे ते तसं बोलत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात आम्ही लोकसभेचा उमेदवार उभा करणार असून निवडून देखील आणणार असल्याचं ठासून सांगत सातारा लोकसभा उमेदवारीबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.



मराठा आरक्षण मिळायला हवं : मराठा समाजाला आरक्षण हे या सरकारनं दिलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना व्हावी तसंच इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. इतरांच्या ताटातलं काढून न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा. अधिवेशनात आरक्षणावर काय चर्चा होते, यावर आमचं लक्ष असेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.


उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का : अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे उदयनराजेंची राजकीय गोची होणार आहे, हा धागा पकडून उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का? त्यांचं भाजपामध्ये मन लागत नाही, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, 'उदयनराजेंचं कुठे कुठे मन लागत नाही, त्याची माहिती मला खासगीत द्या, असं शरद पवारांनी म्हणताच पत्रकार परिषदेत जोरदार हशा पिकला.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar : देशात सत्तेचा गैरवापर, शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
  2. बारामतीच काय राज्यात शरद पवारांना पर्याय नाही; अजित पवारांच्या घोषणेवर शरद पवार गटाचा दावा
  3. शरद पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी, अजित पवारांना सडेतोड उत्तर; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
Last Updated :Dec 3, 2023, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.