रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळाचा फटका मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदारांना बसला आहे. वेळासमध्ये अनेकांच्या आंबा बागायती आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी या बागा वाढवल्या, मात्र वादळामुळे या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यात बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरीत धडकल्याने हजारो झाडं उन्मळून पडली आहेत. कुणाची शंभर, कोणाची दोनशे तर कोणाची पाचशे आंब्याची झाडे या वादळात उद्धवस्त झाली आहेत. ऐन आंब्याच्या मोसमात आलेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंब्याच्या उत्पन्नावर वर्ष भराची बेगमी केली जाते. मात्र, आता या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतील. त्यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे.