रत्नागिरी - ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत आता रत्नागिरीतून आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ प्रयत्न करणार आहे. राज्यातील महापालिकांमध्ये राहणार्या 3 कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचला पाहिजे याकरिता संघाचे प्रयत्न आहेत. याला आंबा बागायतदारांचाही प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांनी दिली.
कॅनिंगसाठी आंबा विकताना तो 50 रुपये प्रति किलो या हमीभावाने विकावा. कॅनिंग फॅक्टरी प्रतिनिधींनी शेतकर्यांचे नुकसान न करता हा हमीभाव दिला पाहिजे, याकरिता तालुका खरेदी विक्री संघ समन्वय साधणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुसरी मासिक बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीकरिता धोरण
यावेळी माने यांनी सांगितले की, थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीकरिता शेतकर्यांना गतवर्षीप्रमाणे मदत करण्याचे धोरण तालुका खरेदी-विक्री संघाने आखले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या महापालिकांमध्ये सुमारे तीन कोटी जनता राहते. त्यांना थेट घरापर्यंत आंबा पोहोचला पाहिजे. गतवर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता व अनेक शेतकर्यांना फायदा मिळाला होता. यंदासुद्धा कोरोनाच्या संकट काळात हेच करावे लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले.
हवामान बदलाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी - माने
सध्या कोकणात बदलत्या हवामानामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आंबा बागायतदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यामुळे सरकारने तात्काळ या हवामान बदलाचा अभ्यास करून पीक विमा योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि कृषी विभागाने यामध्ये प्रामुख्याने भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे कृषी विभागाकडून पीक विम्याचा लाभ झाला आहे का, या सर्व प्रक्रियेवर तालुका खरेदी विक्री संघ लक्ष ठेवणार आहे. पीक विमा योजनेचे निकष, आंबा, काजू लागवड, भौगोलिक सलगता व हवामान बदल यानुसार विम्याचा लाभ शेतकर्यांना मिळाला पाहिजे. याकरिता तालुका खरेदी विक्री संघ शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकर्यांवर अन्याय होत असेल तर त्यांनी खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन माने यांनी केले.
केंद्र सरकार पुरस्कृत भात खरेदी योजनेनुसार शेतकर्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेतकर्यांनी अधिकचे उत्पादन घेऊन ते हमी भावाने विक्री केल्यास शेतकर्याला हातभार लागेल. याकरिता जनजागृती करण्याचे काम तालुका खरेदी विक्री संघ करत आहे. यासाठी तालुका दौरा सुरू आहे. सोमेश्वर, खेडशी, दांडेआडोम, चांदेराई, नाणीज, हातखंबा, करबुडे, शिरगाव येथे 15 मार्चपर्यंत बैठका घेण्यात येणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
काजू बियास हमीभाव मिळाला पाहिजे - माने
गेल्यावर्षी कोरोनाचा गैरफायदा घेऊन काजू बीचे दर पाडण्यात आले. त्यामुळे यंदा कोणत्याही शेतकऱ्याने 50 रुपयांच्या खाली काजू बी विकू, यादृष्टीने आमचा प्रयत्न राहील. शेतकऱ्यांना काजू बियांचा किमान हमीभाव 150 रुपये मिळालाच पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.