पालघर/वसई - राज्य भरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. पुन्हा एकदा शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही वसई जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या आई चंडिका मातेचा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून शुक्रवारी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पालखी पूजन करून साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.
करोनामुळे यंदाचा उत्सव सुद्धा अगदी साधेपणाने साजरा केला आहे. दोन पुजारी, दोन विश्वस्त यांच्या उपस्थितीत गाभाऱ्यातच पालखी पूजन करण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांनी सुद्धा घरच्या घरी राहून आनंदोत्सव साजरा करून चांगले सहकार्य करावे असे चंडिका देवी न्यास विश्वस्त मनोहर पाटील यांनी सागितले.
नाट्यप्रयोग, रांगोळी प्रदर्शन, पालखी सोहळा, कुस्त्यांचे सामने आदी कार्यक्रम रद्द
चंडिकेचा यात्रोत्सवात जूचंद्र गावातील कलावंत विविध प्रकारचे सामाजिक व समाज प्रबोधन करणारे विषय घेऊन नाट्यप्रयोग व रांगोळी प्रदर्शन यांचे सादरीकरण करतात.
श्री दत्त प्रासादिक बावनचाळ नाट्य मंडळ यांच्या तर्फे मागील ११४ वर्षांपासून विविध नाट्यप्रयोग केले जातात. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून नाट्यप्रयोगाची परंपरा खंडित झाली आहे. यात्रेत नाटक सादर करण्यासाठी त्याची दोन ते तीन महिन्यापासूनच तयारी सुरू होते. त्याची स्क्रिप्ट तयार करणे, कलाकार निवड, त्याचा सराव यातून वेगळेच समाधान मिळते.कारण समाजापुढे एक संदेश पोहचविणे हा उद्देश असतो. परंतु करोनामुळे दोन वर्षांपासून नाट्यप्रयोग सादर होत नसल्याने आम्हा कलाकारांनाही याची खंत वाटत असल्याचे नाट्यकलाकार व दिग्दर्शक राजू पाटील यांनी सांगितले आहे. तसेच रांगोळी कलाकारांचेही रांगोळी प्रदर्शन होणार नाही यामुळे यात्रेत जो रांगोळी काढण्याचा आनंद असतो तो अनुभवायला मिळणार नाही असे रांगोळी कलाकारांनी सांगितले आहे.तर कुस्ती पैलवानासाठी असलेले कुस्त्यांचे जंगी सामनेही रद्द करावे लागले आहेत.
हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत