ETV Bharat / state

Youths Drown In Nandurbar : धरणात बुडून दोन भावांसह तिघांचा करुण अंत; दोन घटनात तिघांच्या मृत्यूनं हादरले नागरिक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 11:37 AM IST

Youths Drown In Nandurbar
धरणात बुडून युवकांचा मृत्यू झाल्यानं नागरिकांनी केलेली गर्दी

Youths Drown In Nandurbar : धरणात बुडून दोन भावांसह तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नवापूर तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या तिघांचा मृत्यू झाला. यात दोन भावंडांचा मृत्यू बर्डीपाडा धरणात बुडून झाला आहे. तर एका तरुणाचा मृत्यू भवरे धरणात झाला आहे.

नंदुरबार Youths Drown In Nandurbar : नवापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. यात दोन भावांचा बर्डीपाडा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तर एका युवकाचा नवापूर शहरालगत असलेल्या भवरे धरणात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन गोरख वळवी, प्रीतम गोरख वळवी आणि निखिल राजपूत अशी या मृतांची नावं आहेत. दोन्ही भावांवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात तर नवापूर येथील तरुणाचं उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बर्डीपाडा धरणात दोन भावांचा बुडून मृत्यू : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील आर्यन गोरख वळवी (वय 14), प्रीतम गोरख वळवी (वय 12) हे दोघं भाऊ त्यांच्या शेतालगत असलेल्या धरणात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही भावांना उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गावकऱ्यांनी घटनास्थळी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन भावांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवापूर शहरातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू : नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीत राहणाऱ्या निखिल राजपूत (वय 17) हा युवक राहत होता. तो सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत इयत्ता अकरावीत शिकत होता. सकाळच्या सत्रात निखिल हा महाविद्यालयात गेला होता. दुपारी दीडच्या सुट्टीत महाविद्यालयात न जाता घरी जेवण करून बाहेर जाण्याचं त्यानं नियोजन केलं. मृत निखिल राजपूत यानं घरी जेवण केल्यानंतर तालुक्यातील भवरे धरणावर चार वर्गमित्रांसोबत फिरण्यासाठी गेला. निखिल धरणात आंघोळ करत असताना पाण्यात बुडू लागल्यानं त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याच्या मित्रांना पोहता येत नसल्यानं त्यांनी त्याला वाचवण्यासाठी जवळील गुराख्यांची मदत घेतली. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केलं.

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन : भवरे धरणात निखिलचा बुडून मृत्यू झाल्यानंतर त्यास नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत निखिलवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, हवालदार दादाभाई वाघ आदींनी पाहणी केली. याबाबत नवापूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुलाच्या मृत्यूनंतर आई वडिलांची प्रकृती खालावली : नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीतील रहिवाशी निखिल राजपूतचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतात परिसरावर मोठी शोककळा पसरली. तर मृत निखिल राजपूतच्या आई वडिलांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. Ganesh visarjan 2022 : विसर्जनात बाप्पाला निरोप द्यायला जाणाऱ्या तरुणानेच घेतला अखेरचा निरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.