नंदुरबार - शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे. याठिकाणच्या आंबापाणी आणि केवलापाणी पाड्यातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यांना मिळेल ते दुषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे.
शहादा शहरापासून २५ किलोमीटरवर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये केवलापणी आणि आंबापाणी ही दोन गावे आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १२ पाडे असून याचे क्षेत्र जवळपास ७ किलोमीटर परिसरात विस्तारलेले आहे. याठिकाणी जवळपास १५०० ते २००० हजार लोकसंख्या आहे. मात्र, तरीही शासनातर्फे येथे कोणतीच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठा वणवण करावी लागत आहे.
गावातील हातपंपांची पाणीपातळी खोल गेल्याने गावकऱ्यांना पिण्याचा पाण्यासाठी डोंगर रांगामध्ये जाऊन झऱ्याचे किंवा आटलेल्या नदीच्या डबक्यातील पाणी आणावे लागते. या गावातील महिला आणि मुलांचा पूर्ण दिवस पाणी आण्यातच जातो. गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून गावात कायम स्वरुपी पाणी योजना सुरू कराव्यात, यासाठी शासनाकडे मागणी केली. मात्र, त्यांच्या पदरी फक्त निराशा पडली पडली आहे.
भीषण दुष्काळामुळे याठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील गावांपासून ४ ते ५ किलोमीटर परिसरात पाण्याचे स्त्रोत असल्याने त्याठिकाणाहून पाण्याची उपाय योजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या गावाच्या नावामध्ये पाणी असले तरी या गावकऱ्यांना पाण्यासाठीचा संघर्ष नित्याचा झाला आहे. प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात दंग आहे. या टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाय योजना कधी होतील, हा एकच प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.