ETV Bharat / state

तापी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 27, 2020, 11:42 AM IST

Tapi river
तापी नदी

जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी नदीच्या पाणीपात्रात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत नदीकाठावरिल गावात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नंदुरबार- तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होणार असून पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रकाशा बॅरेजच्या अधोबाजूने गोमाई नदी सुमारे दीड मीटर उंचीने पाणी वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले असून 31364 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले असून 37 हजार क्युसेक विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीला पूर आल्याने या नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 6 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 35165 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 5 दरवाजे 3 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 45498 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

पुढील 72 तासासाठी नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.