ETV Bharat / state

"चिंता करु नका, मनात विदर्भच"; देवेंद्र फडणवीस यांचा विदर्भाच्या प्रश्नांवरुन विरोधकांवर हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:40 AM IST

Maharashtra Assembly Session 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Session 2023 : विदर्भाच्या प्रश्नांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात चर्चा केली. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढले. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्याच्या प्रश्नावर एकत्र उत्तर दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन "काही मुद्दे सुटले असतील पण मनात विदर्भच आहे, त्यामुळं चिंता करू नका", असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नागपूर Maharashtra Assembly Session 2023 : "विदर्भाच्या प्रश्नावर भाषणातील काही मुद्दे सुटले असतील, तर चिंता करू नका, मनातून विदर्भ सुटू शकत नाही. राज्यातील सरकारचं विदर्भाकडं पूर्णपणे लक्ष आहे" असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

चिंता करू नका, मनात विदर्भच आहे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित उत्तरं दिली. मात्र आम्ही आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, याचा उल्लेख कुठंही आला नाही. तसंच फक्त घोषणा केल्याचं दानवे यांनी म्हटलं. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की "विदर्भाच्या प्रश्नावर माझ्या बोलण्यात काही मुद्दे सुटले असतील, तर चिंता करू नका. भाषणात मुद्दे सुटले तरी मनातून मुद्दे सुटू शकत नाहीत. कारण मनात विदर्भच आहे, त्यामुळे काही अडलं असेल ते देखील आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करु" अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात दिली.

विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न : दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षानं अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा केली. मात्र सत्ताधारी पक्षानं चर्चा विधान परिषदेत उपस्थित केली. याला उत्तर आपण देत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपुरातील अधिवेशन हे नागपूर करारानुसार होते. आता 10 दिवस किवा 11 दिवस असे बोर्ड लावतात. पण आधीच्या सरकारनं तर 2 वर्ष अधिवेशनच घेतलं नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहेत. विदर्भाच्या अनुशेषाची चर्चा होते. आता आर्थिक अनुशेष संपला, भौतिक थोडा आहे. या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं जेव्हा हा प्रश्न मांडला, त्यावेळी बळीराजा जलसंजीवनीच्या माध्यमातून त्यांनी मोठी मदत केली. 80 टक्के प्रकल्प हे विदर्भातील होते. मी त्यांचं मनापासून आभार मानत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमचं सरकार आल्यानंतर 32.14 दलघमी पाणीसाठा निर्माण केला. 29 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. धरण आणि कालव्याच्या दुरुस्तीचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. विशेषतः आदिवासी क्षेत्रात 8041 हेक्टर अतिरिक्त सिंचन निर्माण होण्यास मदत होणार आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

वैनगंगा-नळगंगा हा विदर्भात क्रांती करणारा प्रकल्प : विदर्भासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प असलेला वैनगंगा-नळगंगा हा 88 हजार कोटींचा प्रकल्प क्रांती करणारा प्रकल्प ठरणार आहे. आपलं सरकार असताना या संदर्भात सर्व मान्यता घेण्यात आला होता. मात्र गेल्या सरकारच्या काळात याची फाईल पुढं सरकली नाही. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता घेण्यात येईल. तसेच जिगाव प्रकल्पाला देखील मोठा निधी दिला आहे. यातून बुलडाणा जिल्ह्यात मोठा लाभ मिळणार आहे. गोसीखुर्दसाठी 1500 कोटी रुपये आपण दिले, 2024 पर्यंत हा पूर्ण होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात म्हटलं आहे.

गडचिरोली राज्याला देईल 50 हजार कोटीचा महसूल : "राज्यात नवीन सरकार आल्यापासून विदर्भात 26 मोठे आणि छोट्या प्रकल्पांसाठी 50 हजार 595 कोटी रुपयाचे देकार पत्र दिलं. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. कोनसरीच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा गुंतवणूक येत आहे. योग्य लक्ष दिलं तर एकटा गडचिरोली जिल्हा राज्याला 50 हजार कोटींचा महसूल देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती टेक्सटाईल पार्कमध्ये आता एकही जागा शिल्लक नाही. नागपुरात सौर ऊर्जेसाठी ₹18 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. समृद्धी महामार्ग झाल्यामुळं उद्योग विस्तार मोठ्या प्रमाणात होणार आहे. लॅाजिस्टिक पार्क नागपुरात उभा राहतो, यातून रोजगार निर्मिती होणार आहे. विदर्भातील ज्या जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नव्हतं, त्या सर्व जिल्ह्यांना मेडिकल कॉलेज देण्यात आलं आहे. LIT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. अकोल्यात सुपरस्पेशालिटीचं काम केलं", असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सागंतिलं.

लोणार सरोवराच्या विकासासाठी 91 कोटी : अमरावती जिल्ह्यात मराठी विद्यापीठ तयार होतं आहे. राज्याचे नवीन खनिज धोरण अंतिम टप्प्यात आहे. अंभोऱ्यात 329 कोटींचा जागतिक जल पर्यटनाचा प्रकल्प उभा राहत आहे. तसेचं लोणार सरोवराच्या विकासासाठी 91 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी तयार करत आहोत. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. यंदा धानाला 20 हजार रुपये बोनस जाहीर केला. 1400 कोटी रुपये त्यासाठी देण्यात येणार आहेत. गेल्यावेळी 15,000 रुपये बोनस दिला होता. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात कायदा व्यवस्था उत्तम, सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - देवेंद्र फडणवीस
  2. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा न करता सरकारचा अधिवेशनातून पळ - विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
  3. मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.