ETV Bharat / state

Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी महामार्ग' मृत्यूचा सापळा बनलाय? अपघातांची मालिका थांबेना; जाणून घ्या आकडेवारी

author img

By

Published : Jul 1, 2023, 6:07 PM IST

Updated : Jul 1, 2023, 7:25 PM IST

Samruddhi Mahamarg Accident
समृद्धी महामार्ग अपघात

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारी (1 जुलै) पहाटे खासगी बसचा (Buldhana Bus Accident) अपघात होऊन तब्बल 26 प्रवाशांचा (26 Killed in Buldhana Bus Accident) मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

रस्ते सुरक्षेसंदर्भात माहिती देताना

मुंबई/नागपूर - समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका (Samruddhi Mahamarg Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यामधून (Buldhana Bus Accident) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत.

'समृद्धी'वरील मृत्यूंचा आकडा - डिसेंबर 2022 ते जून 2023 म्हणजे 6 महिने या कालावधीत 368 पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात जवळपास 70 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला तर 150 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. पण यातले सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झाले असल्याचे समोर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे मागील सहा महिन्यात 106 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Samruddhi Mahamarg Accident
समृद्धी महामार्ग अपघात

बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात - डिसेंबर 2022 ला महामार्ग सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 180 अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बुलडाणा जिल्हा वगळता इतर भागात अपघाताचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातच अपघाताचे प्रमाण अधिक का आहे याचे कारणे शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

'महामार्ग संमोहन' म्हणजे काय? - समृद्धीवरील अपघातासाठी 'महामार्ग संमोहन' जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. त्यात जास्ती वळणे नसतात. त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक तास धावत असते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदुर सक्रिय नसतो. त्या स्थितीला 'महामार्ग संमोहन' असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे.

Samruddhi Mahamarg Accident
समृद्धी महामार्ग अपघात

समृद्धीवरील अपघातांची कारणे - लेन कटिंग हे समृद्धी महामार्गावर अपघाचे एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच ट्रकचालक हे लेन चेंज करताना नियमांचे पालन करत नसल्याचेही समोर आले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील अपघाताला कारणीभूत ठरत आहे. चालकाचे लक्ष विचलित झाल्यानेही अनेक अपघात झाले आहेत. वाहन चालवताना अनेकजण मोबाईलचा वापर करतात. तसेच चालकाला डुलकी लागणे हे देखील कारण अपघाताला आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे.

अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे? : समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांसंदर्भात बोलताना कम्युनिटी इम्पॅक्ट युनायटेड रस्ता सुरक्षा संस्थेचे व्हॉईस प्रेसिडेंट अजय गोवले म्हणाले की, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने या अपघातांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्त्यावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे. वाहन चालकांना विश्रांती मिळत नाही आणि दूरवर असलेल्या रस्त्यांवर अन्य काहीही नसल्याने वाहकांना वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. तसेच रस्त्यावर तोच तोचपणा आल्याने वाहकांना एक प्रकारचा बधिरपणा येतो आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अतिवेगामुळे अपघात होत आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात दखल घेऊन पोलीस चौकी आणि विश्रांती थांबे तयार करायला पाहिजे, अशी मागणी गोवले यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने या अपघातांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्त्यावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे - कम्युनिटी इम्पॅक्ट युनायटेड रस्ता सुरक्षा संस्थेचे व्हॉईस प्रेसिडेंट अजय गोवले

अपघाताची आणखी कारणे - महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे ७२, प्राणी मध्ये आल्याने १८, तांत्रिक बिघाडामुळे १६, ब्रेक डाऊन झाल्याने १४; तर इतर काही कारणांमुळे ७४ अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Samruddhi Mahamarg Accident
समृद्धी महामार्ग अपघात

बसचा भीषण अपघात - महामार्गाच्या उद्घाटनापासूनच अत्यंत चर्चेचा विषय आणि अपघातांची मालिका सुरू करणारा म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जाऊ लागला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातातील आतापर्यंत बळींची संख्या 70 च्या आसपास झाली आहे. बुलडाणाजवळ वैभव ट्रॅव्हल्स या बसचा टायर फुटून झालेल्या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाल्याने हा सर्वात भीषण अपघात मानला जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा महामार्ग नव्हे तर मृत्यूचा सापळा ठरतो आहे.

अपघातांवरुन आरोप-प्रत्यारोप :

बुलडाणा येथील बस अपगात ही घटना दुर्दैवी असून मन हेलावून टाकणारी आहे. मागील वर्षभरात महामार्गावर तीनशेहून अधिक प्रवाशी दगावले. सरकार ढिम्म असल्याने आजवर कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत - उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मिडीया इव्हेंट करण्यात आला. घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. ही हत्या असून, या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार आहेत - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील

अत्यंत असंवेदनशील सरकार. देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या - खासदार संजय राऊत

मी पण एकदा त्या महामार्गाने गेलो होतो. त्यावेळी तेथील लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोकं म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो, असे लोक सांगतात. त्याचे कारण रस्त्याचे काम कदाचित शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केले त्यांना नागरिक दोषी ठरवत आहेत. आज जे झाले ते वाईट झाले - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

समृद्धी महामार्गावर १०० दिवसात ९०० अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्युचा मार्ग बनत चालला आहे. शिंदे फडणवीस सरकारने तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून या घटनेची चौकशी करावी तसेच दुर्घटनाग्रस्तांना भरपाई द्यावी - महाराष्ट्र काँग्रेस

'समृद्धी'वरून राजकारण - समृद्धी महामार्ग् उद्घाटनापासूनच सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महामार्गाचे उद्घाटन हा भाजपचा इव्हेंट असल्याची टीका त्यावेळी विरोधकांनी केली होती. शनिवारी(1 जुलै) बुलडाणा येथे खासगी बसला अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बुलडाणा अपघाताच्या सर्व बातम्या वाचा येथे -

  1. Buldhana Bus Accident : जो अपघातात मृत्यू पावतो 'तो' देवेंद्रवासी होतो, समृद्धी महामार्ग दुर्घटनेप्रकरणी शरद पवारांचा हल्लाबोल
  2. Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण आले समोर
  3. Uddhav Thackeray criticism Shinde Govt: शेकडोंचा जीव जाऊनही सरकार ढिम्म; बुलडाणा अपघातावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले
  4. Bus Accident in Buldhana : बसच्या फिटनेससोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष; गमवावा लागला जीव
  5. ​Buldhana Bus Accident : खासगी बस अपघातग्रस्तांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी - फडणवीस
Last Updated :Jul 1, 2023, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.