ETV Bharat / state

Eknath Shinde : बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्यासाठी प्रयत्न चालू - एकनाथ शिंदे

author img

By

Published : Aug 14, 2023, 5:17 PM IST

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांची सोडत धुमधडाक्यात काढण्यात आली. यावेळी बोलताना, 'आम्ही मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडली. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. तब्बल ४ वर्षांनी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढली जात असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांसाठी एकूण १ लाख २० हजार १४४ जणांनी अर्ज भरले होते.

मुंबईकरांना परत आणण्यासाठी प्रयत्न चालू : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 'ज्यांना लॉटरी लागली त्यांच्यासाठी समाधानाचा दिवस आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कसा बदल होईल, अशीच आमची भूमिका आहे. यापूर्वी गिरणी कामगारांना देखील घराच्या चाव्या दिल्या गेल्या आहेत. मागच्या अडीच वर्षात निर्णय थांबले होते. पण आमचे सरकार आले आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीपासून आम्ही कामे मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला. यापूर्वी रखडलेले अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावत आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना घरांच्या माध्यमातून पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

घरांची संख्या वाढणार : 'आम्ही एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून घरे बांधण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या वर्षात या घरांची संख्या नक्कीच वाढणार आहे. धारावीसारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यात लक्ष घातले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये दिले आहेत. मुंबई-शिवडी-नाव्हाशेवा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्णत्वास जाईल. मेट्रो ३ चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मेट्रोमुळे ३५० किलोमीटरचे जाळे विणले जाणार आहे', असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

टीकेला कामातून उत्तर देऊ : 'सरकारी काम, सहा महिने थांब, ही म्हण आम्ही बदलत आहोत. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत आहोत. मुंबई बदलत आहे. जी २० परिषद मुंबईत होत आहे. आम्ही पंढरपूरचाही विकास करू. तुम्ही जेवढे आरोप कराल, त्याच्या डबल आम्ही काम करू. टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावी. आम्ही दुप्पट वेगाने काम करत राहू', असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांना लगावला.

हेही वाचा :

  1. Lavasa Project Issue : लवासा प्रकल्पाविरुद्ध पुन्हा एकदा लढाई सुरू...लढणार, मरणार पण जमिनी नाही देणार
  2. MHADA lottery 2023 : मायानगरीतील 4082 फ्लॅटच्या चाव्या कुणाच्या हाती? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुपारी सोडत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.