ETV Bharat / state

आरबीआयला धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी वडोदरा येथून तिघांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 10:25 PM IST

RBI Threat Email
RBI Threat Email

RBI Threat Email : मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल (RBI) आला होता. त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी आता मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी वडोदरा (गुजरात) येथून तिघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई RBI Threat Email : मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आरबीआयसह इतर 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करणार असल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला होता. तसंच या ईमेलसोबत काही मागण्याही करण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

तीन आरोपींना अटक : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरात राज्यातील वडोदरा येथून धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनावडे यांनी सांगितलं की, तिन्ही आरोपींना आज सायंकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मोहम्मद अर्शिल मोहम्मद इक्बाल टोपाला, आदिल भाई रफिक भाई मलिक तसंच वसीमराजा अब्दुल रज्जाक मेमन अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी 27 वर्षीय मोहम्मद अर्शिल मोहम्मद इक्बाल टोपाला यानं नवीन जीमेल आयडी तयार करून धमकीचा मेल पाठवला होता. मोहम्मद अर्शिल बीबीए विषयात पदवीधर आहे. तसंच तो शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये काम करतो. आरोपी आदिल भाई रफिक भाई मलिक (वय 23) हा अंड्याच्या दुकानात काम करतो, तर वसीमराजा अब्दुल रज्जाक मेमन (वय 35) हा पान टपरीवर काम करतो.


RBI ला धमकीचा ईमेल : या संदर्भात काल माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा 12 नं तिन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी एमआरए मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मंगळवारी सकाळी 10.50 वाजता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) धमकीचा ईमेल आला होता. हा ईमेल Khilafat.india नावाच्या जीमेल अकाउंटवरून करण्यात आला होता.

11 बॉम्ब पेरल्याची माहिती : ईमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक (चर्चगेट) आयसीआयसीआय बँकेत (बीकेसी) बॉम्ब पेरण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. तिन्ही बॉम्बचा स्फोट करण्याची वेळ दुपारी दीड वाजता निश्चित करण्यात आली होती. ज्यामध्ये एकामागून एक 11 बॉम्ब फुटणार असल्याची माहिती मेलमध्ये देण्यात आली होती. या ईमेलमध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. आरोपींनी असा मेल का पाठवला, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा -

  1. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल
  2. आता UPI द्वारे करू शकता ५ लाख रुपयांपर्यंत पेमेंट, RBI ने मर्यादा वाढवली
  3. कर्जाच्या मासिक हप्ताचा व्याजदर राहणार 'जैसे थे’ आरबीआयकडून सलग पाचव्यांदा दिलासा नाही!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.