ETV Bharat / state

Sharad Pawar for MVA Stronger : महाविकास आघाडी मजबुतीसाठी शरद पवारांची हाक; कोर्टाच्या निर्णयानंतर पवारांचा सूर वाढला

author img

By

Published : May 12, 2023, 1:23 PM IST

Updated : May 13, 2023, 8:15 PM IST

Sharad Pawar for MVA stronger
Sharad Pawar for MVA stronger

सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे महाराष्ट्राचे प्रकरण सोपवण्याचा निर्णय दिला. पण कोर्टाने अनेक विपरीत निरीक्षणे नोंदवली असली तरी सरकार स्थिर राहिले आहे. आता महाविकास आघाडीने एकजूट राहण्याची गरज शरद पवार यांनी गुरुवारी निकालानंतर बोलून दाखवली होती. मुख्यमंत्रीपदी शिंदेच राहणार असल्याने आता शरद पवार हे महाविकास आघाडीला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे बोलले जात आहे. तसेच कोर्टाच्या निकालानंतर आता अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पुर्णविराम लागणार आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा निर्णय कायम ठेवल्याने विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे राजकीय स्वप्न भंगले होतेच आता सत्ता संघर्षाच्या बाबतीत काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. आता त्यांच्याकडे शिंदे - फडणवीस सरकारला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. अनेक अटकळींना पूर्णविराम मिळाला. तसेच आधीच फुटीच्या उंबरठ्यावर असलेली राज्यातील महाविकास आघाडी मजबूत करण्याची सूचक हाक यानिमित्ताने शरद पवार यांनी दिली आहे. एवढेच नाही तर देशपातळीवर विरोधकांची वज्रमूठ बांधली पाहिजे. त्यासाठी आपण काम करणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांचा महाविकास आघाडीला सल्ला - कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार पडेल असे अनेकांना वाटत होते. परंतु, गुरुवारी कोर्टाने निकाल दिला असून, अनेक ताशेरे ओढणारे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, तरीही राज्य सरकार स्थिर राहणार आहे. यामुळेच आता शरद पवार यांनी यापुढे महाविकास आघाडीला एकजूट राहण्याचा सल्ला दिला आहे. कोर्टाने शिंदे सरकारविरोधात निकाल दिला असता तर अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळेच अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्याही वावड्या उडत होत्या. मात्र, कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अजित पवार यांचे स्वप्नभंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निर्णयावर थेटपणे आक्षेप - गुरुवारी सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे महाराष्ट्राचे प्रकरण सोपवण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय कोर्टाने दिला असला तरी हा निर्णय जाहीर करताना घटनापीठाने महाराष्ट्रातील तत्कालीन घडामोडी आणि आणि शिंदे गट, राज्यपाल तसेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर थेटपणे आक्षेप नोंदवले आहेत. काही गोष्टी बेकायदेशीर झाल्या असल्याचेही कोर्टाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणावरही परिणाम झाला आहे. भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शरद पवारांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सर्व मतभेद विसरुन मजबूत झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी सर्वांनीच एकत्र बसून जे काही मतभेद असतील ते मिटवण्याची गरजही पवारांनी बोलून दाखवली.

अजित पवारांचे उपद्रवमूल्य - राज्यातील सत्तेमध्ये या घटनापीठाच्या निकालानंतर मोठे बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामध्ये विद्यमान सरकारला पायउतार व्हावे लागेल, अशा प्रकारे अनेक राजकीय विश्लेषकांनी मत मांडले होते. मात्र तसे काही झाले नाही, किंवा होणार नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले. निकालापूर्वी अजित पवार यांच्याबद्दल तर अनेक अफवांचे पीक आले होते. अजित पवार त्यांचा एक गट किंवा सर्वच राष्ट्रवादीचे आमदार घेऊन भाजपच्या संपर्कात आहेत. तसेच शिंदे सरकार पडल्यावर भाजपच्या मदतीने पवार सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदच भूषवतील अशा प्रकारच्या अनेक अफवा उठल्या होत्या. वास्तविक या सगळ्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे खुद्द अजित पवार यांनीही एक नाही तर दोनवेळा स्पष्ट केले होते. मात्र राजकीय चर्चांना निकालापूर्वी उधाण आले होते. त्याला कारणही तसेच होते. अजित पवार यांनी पुण्यातील काही कार्यक्रम अचानकपणे रद्द केले होते. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली होती. तसेच अजित पवार दिल्लीला गेल्याचीही अफवा होती. त्यावरही त्यांनी कालच आपण दिल्लीला गेलो नाही असे स्पष्ट केले. मात्र अजित पवार यांच्याबद्दल अफवांचे पीक उठल्याने जर विद्यमान सरकारला धोका निर्माण झाला तर नवीन सरकारमध्ये अजित पवार यांची भूमिका महत्वाची असेल असाच होरा राजकीय तज्ञांनी मांडला होता. मात्र कालच्या निकालाने अजित पवार यांचे उपद्रवमूल्य पूर्णपणे संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शरद पवारांनीही काळाची पावले ओळखून राज्यात महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.

वैजनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया

अजित पवारांचे पुन्हा स्वप्नभंग - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा निर्णय कायम ठेवल्याने विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे राजकीय स्वप्न भंगले होते. आता सत्ता संघर्षाच्या बाबतीत काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. आता त्यांच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही. अजित पवारांची मुख्यमंत्री पदाबाबतची लालसा लपून राहिलेली नाही. अशातच त्यांनी, "मी आजही मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकतो", असे स्पष्टपणे सांगून त्यांची महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. अजित पवारांची ही महत्त्वाकांक्षा शरद पवार यांच्याच नाही तर राष्ट्रवादीतील बडे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या नजरेतूनसुद्धा लपलेली नाही. म्हणूनच ज्या प्रसंगी शरद पवारांनी आपली भूमिका बदलत अध्यक्षपदावर कायम राहण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती, त्याप्रसंगी अजित पवार यांची अनुपस्थिती सुद्धा बरच काही सांगून गेली. एकूणच या सगळ्या गोष्टी पाहता अजित पवार यांचा स्वप्नभंग झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समन्वयक वैजनाथ वाघमारे यांनी दिली आहे.

शरद पवार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय - महाराष्ट्राच्या संदर्भातील या घडामोडी घडतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शरद पवारांची काल भेट घेतली. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की देशपातळीवर संयुक्त पुरोगागमी आघाडी अर्थात युपीएची जबाबदारी शरद पवार यांनी घेतली तर आम्हाला आनंदच आहे असे नितीश कुमार यांनी अगदी दिलखुलासपणे सांगितले. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रावादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तो मागे घेतलेले शरद पवार पुन्हा राष्ट्रीय राजकारणातही चमकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी अजित पवार यांचे उपद्रवमूल्य मात्र कमी झाल्याचे दिसून आले आहे.

  • हेही वाचा -
  1. Uddhav Thackeray on SC verdict : विधानसभा अध्यक्षांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ-उद्धव ठाकरे
  2. Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार
  3. Jayant Patil ED probe: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ईडीकडे एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी मागितली १० दिवसांची मुदत
Last Updated :May 13, 2023, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.