ETV Bharat / state

Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी' नव्हे 'मृत्यूचा' महामार्ग? आजपर्यंत अपघातांत किती जणांचा मृत्यू? काय आहेत अपघातांची कारणं, वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 8:05 AM IST

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. यामुळं समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

मुंबई Samruddhi Mahamarg Accident : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात झालाय. सैलानी बाबाच्या दर्शनासाठी जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झालाय. यात चार महिन्याच्या बालकाचादेखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती हाती आलीय. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

अपघाताची कारणं काय : समृद्धी महामार्गावर गतीचं नियंत्रण नसणं व वाहन चालकाला झोप येणं ही आजवरच्या अपघाताची प्रमुख कारणे दिसून येत आहेत. यासोबतच समृद्धीवरील अपघातासाठी 'महामार्ग संमोहन'ही जबाबदार असल्याचा दावा करण्यात आलाय. एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. त्यात जास्त वळणं नसतात. त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक तास धावते. अशा परिस्थितात तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तसंच तुमचा मेंदू सक्रिय नसतो. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडतोय. यामुळं मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचं तपासात समोर आलंय. लेन कटिंग हे समृद्धी महामार्गावरील अपघातांचे एक मुख्य कारण आहे. समृद्धी महामार्गावर बहुतांश वाहनं वेगमर्यादा ओलांडत असल्याचंही पुढं आलंय. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्यानं सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

कशाप्रकारचे अपघात अधिक : महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांची कारणं शोधण्याचा प्रयत्न केलाय. यात सर्वाधिक 104 अपघात डुलकी लागल्यानं किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्यानं घडले आहेत. तर 81 अपघात हे टायर फुटल्यानं घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळं घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचं म्हटलं जातय. अतिवेगामुळं 72, प्राणीमध्ये आल्यानं 18, तांत्रिक बिघाडामुळं 16, ब्रेक डाऊन झाल्यानं 14; तर इतर काही कारणांमुळं 74 अपघात घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

आतापर्यंत किती आपघात : महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आजवर एकूण 729 छोटे-मोठे अपघात घडले आहेत. यात 262 गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर 47 अपघाताच्या घटनेत 101 प्रवाशांचा मृत्यू झालाय. यातील 44 मृत्यू हे चालकाला झोप लागल्यानं तर सुमारे 33 जणांचा मृत्यू वाहनाच्या अतिवेगामुळं झालाय. 10 जणांचा मृत्यू वाहनाचं टायर फुटल्यामुळं तर 11 जणांचा मृत्यू अन्य कारणांमुळं झालाय.

  • कोणत्या ठिकाणी सर्वाधिक अपघात : डिसेंबर 2022 ला समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 180 अपघात झाले आहेत. त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बुलडाणा जिल्हा वगळता इतर भागात अपघातांचं प्रमाण कमी आहे.

एका अपघातात 26 जणांचा मृत्यू : 1 जुलैला मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सला झालेला अपघात सर्वाधिक भीषण होता. या अपघातात झोपेत असलेल्या 26 प्रवाशांचा बसमध्ये मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक माहिती फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून समोर आली होती. अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार अपघाताच्या दिवशी ड्रायव्हर शेख दानिश याच्याकडून घेतलेल्यातून रक्ताच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा 30 टक्के जास्त आढळली होती.

अपघातावरून राजकारण : समृद्धी महामार्गच्या उद्घाटनापासूनच सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. महामार्गाचे उद्घाटन हा भाजपाचा इव्हेंट असल्याची टीका त्यावेळी विरोधकांनी केली होती. बुलडाणा येथे खासगी बसला अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या अपघातानंतरही समृद्धी महामार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली.

हेही वाचा :

  1. DCM Ajit pawar on Samruddhi Expressway : लांबच लांब सरळसोट रस्ताच समृद्धी महामार्गावर अपघाताचं कारण, अजित पवार बोलले तरी काय?
  2. Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सैलानी बाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या १२ जणांवर काळाचा घाला, २० जण जखमी
  3. Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघाताविषयी शोक व्यक्त; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 5 लाखांची मदत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.