ETV Bharat / state

Raj Thackeray: दिल्लीतील कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं प्रंतप्रधानांना पत्र

author img

By

Published : May 31, 2023, 8:47 PM IST

Updated : May 31, 2023, 8:55 PM IST

Raj Thackeray
राज ठाकरेंचं प्रंतप्रधानांना पत्र

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मागील 3 महिने कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आता राज ठाकरेंनी लक्ष दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्या मेहनतीने देशासाठी अनेक पदके जिंकली त्या 'देशाच्या कन्या' न्यायासाठी याचना करत आहेत, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई : 28 मे रोजी घडलेल्या प्रकाराप्रमाणे त्याला वागणूक मिळायला नको होती. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची, त्यांचे म्हणणे ऐकून तोडगा काढण्याची गरज आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केले आहे. तसेच राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "सस्नेह जय महाराष्ट्र, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरे तर, लक्ष वेधून घेणे हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्यानात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती. ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटिय' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदके बघायला मिळाली आहेत. त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनंती: राज ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, "रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, ह्या लढाईत कोणाच्याही बाहुबलाचं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे. ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होती. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी. ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.



'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील: शेवटी राज ठाकरे म्हणतात की, म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावे असे वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असे चित्र उभे राहिले तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मेला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आश्वस्त केले जाईल इतके तर आपण नक्कीच कराल, ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावे आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.


हेही वाचा -

Wrestlers Protest पदक गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय मागे सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टिमेटम

Wresters Protest जंतरमंतरवरील कुस्तीपटुंचे आंदोलन चिरडल्यानंतर कुस्तीपंढरीत उमटल्या संतप्त प्रतिक्रिया तीव्र आंदोलन छेडण्याचा पैलवानांचा इशारा

Wrestlers Protest जंतरमंतरवर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मध्यरात्री रंगला सामना पोलिसांनी मारहाण केल्याचा कुस्तीपटूंचा आरोप

Last Updated :May 31, 2023, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.