ETV Bharat / state

Mumbai Crime : प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा; एनआयएची वैद्यकीय समिती स्थापन करण्याची मागणी फेटाळली

author img

By

Published : Jan 19, 2023, 9:31 PM IST

Mumbai Crime
प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या विरोधात एनआयएमने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात अर्ज केला होता. प्रदीप शर्मा यांच्या प्रकृती तपासणीकरिता विशेष वैद्यकीय समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी NIA ने केली होती. ही मागणी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून वकील सुनील गोन्साल्विस यांनी प्रदीप शर्मा यांची प्रकृती ठीक असल्याचे युक्तीवादात म्हटले आहे. अनेक महिन्यांपासून प्रदीप शर्मा यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याकरिता विशेष डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावत प्रदीप शर्मा यांच्या प्रकृतीबाबत ससून रुग्णालयातील डिन यांना मेडिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद : प्रदीप शर्मा यांच्या वकिलांच्या वतीने शर्मा यांना फसविण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची फोन कॉल रेकॉर्डनुसार भेट झाली नसल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यात येऊ नये. या प्रकरणात सचिन वाझेप्रमाणे प्रदीप शर्मा यांचे देखील सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला होता.



मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती. त्यात गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

शरीरावर आढळल्या जखमा : मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे पोस्टमार्टमच्या रिपोर्टने समोर आले. हत्येपूर्वी हिरेन यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता.



काय आहे प्रकरण ? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखे मास्क होते. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

हेही वाचा : Nawab Malik JC Extended : नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम 2 फेब्रुवारीपर्यंत वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.