ETV Bharat / state

Maratha Reservation Updates : १० हजार पानांचे पुरावे असूनही मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारचे षडयंत्र- मनोज जरांगे पाटील

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 10:28 AM IST

Updated : Oct 27, 2023, 11:26 AM IST

मराठा आरक्षणांच्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फळ व भाजीपाला मार्केट वगळता उर्वरित तिन्ही मार्केट बंद आहेत. मराठा आरक्षणाकरिता तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दुसरीकडं जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

Maratha Reservation Updates
Maratha Reservation Updates

नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सर्व कामगार आज लाक्षणिक संपावर गेले आहेत. डॉक्टरांकडून तपासणी करण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. दोन दिवस पाणी घेतले नाही.

Live updates:

  • मनोज जरांगे पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला संशय आहे. त्यांनी विषय न घेतल्यानं मराठ्यांना फरक पडत नाही. मात्र, ते विषय विचारात घेतली अशी अपेक्षा होती. त्यांच्याबाबत मराठ्यांना काही वाईट भावना नव्हती. मराठ्यांची पंतप्रधानांबद्दल वाईट भावना असती, तर त्यांचे विमानदेखील शिर्डीत उतरू दिले नसते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना सांगितले नाही का? पंतप्रधानांना गोरगरिबांची गरज राहिलेली नाही. वेळ देऊनही यांनी मराठा आरक्षण दिलेले नाही. मराठ्यांची पोरं मोठे होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी व राज्य सरकारनं षडयंत्र रचल्याचा मराठा बांधवांचा संशय आहे. हे षडयंत्र खोटे असते तर त्यांनी आरक्षण दिले असते, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
  • पुढे जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही वेळ घेऊनही आरक्षण दिले नाही, ही बाब तुमच्या अंगलट आली आहे. सरकारला आता नाक असल्यासारखं झाले आहे. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी पुरावे दिले. तुम्हाला आमच्या खासगी अभ्यासकांनी दहा हजार पुरावे दिले आहेत. १८०५ ते १९६७ चे पुरावे दिले आहेत. समितीनं तपासलेल्या कागदपत्रात काय आहे, हे तुम्ही सांगितलं नाही. १० हजार पानांचे पुरावे असूनही मराठा आरक्षणही दिलं नाही. बॉम्बे गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एक असल्याचे पुरावे दिले आहेत. मराठ्यांच्या मुलाचं भले होऊ नये, यासाठी मोठे षडयंत्र आहे. पुढील तीन ते चार दिवस तुमची झोप उडणार आहे.
  • ओबीसी बांधवांचा आमचा एकच व्यवसाय आहे. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत. बाकीच्यांना पुरावे देऊन आरक्षण दिले नाही. तुम्ही आरक्षण कसे देत नाही, हे आता बघणार नाही. विदर्भात पंजाबराव देशमुख यांनी दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे मराठा आरक्षण देऊ शकता. मराठ्यांकडून बाँड पेपर घेऊनही मराठा आरक्षण देता येते. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून षडयंत्र सुरू असल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला. आता, आम्हाला नेमून दिलेली समितीही मान्य नाही. आमची फसणूक करण्यासाठी समितीची वेळ वाढवून घेतली आहे.


एपीएमसी मार्केटमधील तीन बाजारपेठात कडकडीत बंद- नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज २७ ऑक्टोबरला एपीएमसीच्या कांदा बटाटा, धान्य मार्केट व मसाला मार्केट या तीन बाजारपेठा बंद आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजीपाला व फळमार्केट सुरू आहेत. २६ ऑक्टोबरला झालेल्या माथाडी कामगारांच्या बैठकीत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील उपस्थित होते. नवी मुंबईमधील महत्वाच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारी व शेतकरी वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन उपोषण मागे घेतले होते. मात्र, राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. सरकारच्या माध्यमातून मराठा आंदोलनाबाबत ठोस निर्णय न दिल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
  • हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी एका २५ वर्षीय तरुणानं मराठा आरक्षण मिळावं, या मागणीकरिता आत्महत्या केली. कृष्णा कल्याणकर याने गुरुवारी सकाळी आखाडा बाळापूर गावातील शेतात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. मी मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांन चिठ्ठीत लिहिलं आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरंगे यांनी जालना जिल्ह्यात बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यावरूनही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सरकारनं मराठा आरक्षण आंदोलकांना सांगावे की यातून निघणार आहे का? जर मार्ग असेल तर सरकार प्रश्न का सोडवत नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला.

हेही वाचा-

  1. Maratha reservation News : मराठा आरक्षणाकरिता तरुणाची आत्महत्या, मृत्यपूर्वी लिहिला मन सुन्न करणारा संदेश
  2. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसात दोन तरुणांनी संपवली जीवनयात्रा
Last Updated :Oct 27, 2023, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.