ETV Bharat / state

धाकधूक वाढली... बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर

author img

By

Published : Jul 15, 2020, 7:25 PM IST

Updated : Jul 15, 2020, 9:49 PM IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या (गुरुवार दि. 16 जुलै) रोजी जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून सुमारे 15 लाख 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

maharashtra hsc result 2020
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या (गुरुवार दि. 16 जुलै) रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठीची घोषणा आज (बुधवार) राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात कोरोनाचे संकट गडद होण्यापूर्वीच ही परीक्षा संपली होती. तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे हा निकाल तब्बल दीड महिने उशिराने जाहीर केला जात आहे. मागील चाळीस वर्षात ही अशी पहिलीच वेळ असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया...

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल...

www.maharesult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

हेही वाचा - ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची नियुक्ती नको, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून सुमारे 15 लाख 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. मात्र, आज मंडळाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सर्व विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होणार असून त्यासाठीची प्रत प्रिंट आउटच्या माध्यमातून घेता येणार आहे. तर, www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांखिकीय माहिती मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालय यांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांकडून अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी 17 जुलै ते 27 जुलै, तर छायाप्रतीसाठी 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

Last Updated :Jul 15, 2020, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.