ETV Bharat / state

Breaking News : राज्यातील १४ किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यार सुरुवात - मंत्री मुनगंटीवार

author img

By

Published : Mar 16, 2023, 6:42 AM IST

Updated : Mar 16, 2023, 10:14 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

22:13 March 16

राज्यातील १४ किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यार सुरुवात - मंत्री मुनगंटीवार

मुंबई - महाराष्ट्रातील सिंहगड किल्ला, सिंधुदुर्ग किल्ल्यासह १४ किल्ल्यांवरील अतिक्रमण सरकारच्या निदर्शनास आले असून, अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

21:41 March 16

राज्यात एच३ एन२ चे ६१ नवे रुग्ण, रुग्ण संख्या ११९ वर

मुंबई - राज्यात इन्फल्युएंझा आजाराचा प्रसार वाढत आहे. आज एच १ एन १ चे २१ तर एच३ एन२ चे ६१ रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील एच १ एन १ च्या रुग्णांचा आकडा ३२४ तर एच३ एन२ च्या रुग्णांचा आकडा ११९ वर पोहचला आहे. काल एच३ एन२ मुळे २ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. नागपूर येथील मृत्यू एच३ एन२ मुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याने आतापर्यंत एकच मृत्यू झाला आहे.

20:55 March 16

कृषी मंत्री कोणाचे प्रतिनिधित्व करतात; पीक विमा योजनेवरून भाजप आमदारांने खडसावले

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा ऑनलाइन योजनेचा बोजवारा उडाला आहे. ऑफलाइन कार्यालयांना टाळे असते. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी आणि दादागिरी वाढली आहे. हक्काचा विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. कंपन्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलवून ही हजर राहत नाहीत. कृषी मंत्र्यांकडे तक्रार करून कारवाई होत नाही. आता तर कृषी मंत्री विमा कंपन्यांचे बोल बोलत आहेत. राज्याचे कृषी मंत्री कोणाचे प्रतिनिधित्व करतात, असा जाब भाजप आमदार प्रवीण पोटे - पाटील यांनी विचारत, अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडसावले.

19:57 March 16

रायगड, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, नांदेड, धुळे जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

मुंबई - येत्या ३ ते ४ तासात रायगड, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, नांदेड, धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याची माहिती दिली आहे.

19:22 March 16

बालपणीच्या मित्राकडून खंडणीपोटी तब्बल 48 लाख रुपये उकळणाऱ्याला अटक

ठाणे - नांदेड येथील एका व्यक्तीला त्याच्या बालपणीच्या मित्राकडून 48 लाख रुपये उकळल्याप्रकरणी आणि आणखी पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी टप्प्या टप्प्याने ही रक्कम उकळली होती. शेवटी 5 कोटी रक्कमेची मागणी केल्यानंतर पोलिसांना तक्रारदाराने ही माहिती दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

19:15 March 16

अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर डिझायनर अनिक्षाला अटक

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला अटक केली. पोलीस दुसरा आरोपी अनिल जयसिंघानी याचा शोध घेत आहेत असे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

19:05 March 16

कर्नाटक सरकारने अडकाठी आणली तरी सीमाभागातील मराठी भाषिकांना सुविधा देणार - शंभूराज देसाई

मुंबई - मंत्री शंभूराज देसाई यांनी कर्नाटकच्या भूमिकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील ८६५ गावांबाबत चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. हे प्रकरण यापूर्वी सुप्रीम कोर्टातही गेले आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही तडजोड करुन तोडगा काढण्यासाठी राज्याच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावले होते अशी माहितीही शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्राने पुरवलेल्या सुविधा बंद करण्यासाठी काही पाऊले उचलल्यास मराठी भाषिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कसेही प्रयत्न करत राहू असे देसाई यांनी स्पष्ट केले.

18:26 March 16

अकोल्यात दोन मोटरसायकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू

अकोला - दुपारी दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या धडकेत एका दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना अकोट-अंजनगाव रस्त्यावरील वाई गावाजवळ दुपारी एकच्या सुमारास घडली, अशी माहिती अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. संजय मंजुळकर (50) आणि त्यांची पत्नी शोभा मंजुळकर (48) हे एका मोटारसायकलवर आणि दुसऱ्या दुचाकीवर प्रणय घट्टे (24) अशी मृतांची नावे आहेत.

18:21 March 16

मुख्यमंत्र्यांना संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या निर्णयात फेरफारीचा अधिकार नाही - हायकोर्ट

मुंबई - मुख्यमंत्र्यांना संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या निर्णयामध्ये फेरफार करण्याचा अधिकार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश यानुसार रद्द केला.

18:15 March 16

पिंपरी चिंचवडमध्ये वृद्धाचा H3N2 विषाणूमुळे मृत्यू

पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये आज एका ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाला फुफ्फुसाचा आजार आणि हृदयविकाराचा त्रासही होता, असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

17:58 March 16

रेल्वेकडून ट्रॅक वाढवताना खासगी मालमत्तेवर अतिक्रमण नको

मुंबई - रेल्वेकडून ट्रॅक वाढवत असताना खासगी मालमत्तेवर अतिक्रमण नको. सबब रेल्वेने याबाबत पर्यायी योजना सादर करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. जी एस पटेल यांनी निर्देश दिले.

17:53 March 16

अंधेरीतून 8 कोटी रुपयांचे 15.743 किलो केटामाइन ड्रग जप्त

मुंबई - पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने अंधेरी परिसरातून 8 कोटी रुपये किमतीचे 15.743 किलो केटामाइन ड्रग जप्त केले. तसेच दोन आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक तपासादरम्यान, हे अंमली पदार्थ तस्कर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असल्याचे आढळून आले आहे. ते ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मुंबईत आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसानी दिली.

16:27 March 16

शिंदे गटाचा पक्ष म्हणून संपूर्ण खटल्यात केलेला दावाच पूर्णपणे चुकीचा - ठाकरे गट

नवी दिल्ली - युक्तीवाद संपताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अखेरचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की, राजकीय पक्ष हा शब्द अनिश्चित संकल्पना नाही. राजकीय पक्षात वेगळा गट असू शकतो मात्र या खटल्याच्या संदर्भात 21 जूनला आमच्या नेतृत्वाखाली एकच राजकीय पक्ष अस्तित्वात होता. ते पुढे म्हणाले की, केवळ राजकीय पक्षच व्हीप जारी करू शकतो. नियम 3(1) नुसार ते निश्चित होते. विधिमंडळातील बहुमत एखादा पक्ष म्हणून स्वतंत्रपणे मानले जाऊ शकत नाही. तसेच त्यावेळी 220 जणांच्या प्रतिनिधीसभेपैकी 160 पेक्षा जास्त लोकांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांनी या खटल्याच्या सुनावणीमध्ये वेळोवेळी सांगितले आहे की आम्ही कधीही विभाजनाचा दावा केला नाही, तर आम्हीच शिवसेना आहोत. त्यासाठी कामत यांनी शिंदे गटाने ECI समोर त्यांनी ठेवलेली कागदपत्रे दाखला म्हणून दिली. त्यानुसार शिवसेनेत फूट पडल्याचा पुरावा असल्याचे निवडणूक आयोग म्हणतो. तसेच त्यांच्या लेखी निवेदनात फूट पडल्याचे म्हटले आहे. या सगळ्याचा विचार करता त्यांनी अनेकदा या कोर्टासमोर पक्षात फूट पडलेली नाही असे म्हणणे उघडे पडते असे कामत यांनी स्पष्ट केले. यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वच संबंधित वकिलांचे आभार मानले आणि या प्रकरणाची सुनावणी संपल्याचे सांगून घटनापीठ उठले.

16:05 March 16

ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, आता घटनापीठाच्या निकालाकडे लक्ष

नवी दिल्ली - खरी शिवसेना कोणती ठाकरेंची की शिंदेंची यासंदर्भातील एकूणच सगळ्या खटल्यांची सुनावणी आज सुप्रीम कोर्टातील पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे पूर्ण झाली. यावेळी आपल्या प्रतिवादाचा शेवट करताना ठाकरे गटाच्या वकीलांनी संस्कृत सुभाषित उदगृत करुन न्यायालय योग्य न्याय करील असे म्हटले.

15:50 March 16

संसदीय पक्षातील सदस्यांवर पक्षाचे धोरण पाळणे बंधनकारक असते - सिंघवी

नवी दिल्ली - संसदीय पक्षाला स्वतःची अशी ओळख नसते. संसदीय पक्ष हा फक्त पक्षाचा काही भाग असतो. तसेच संसदीय पक्षातील सदस्यांवर पक्षाचे धोरण पाळणे बंधनकारक असते. ते स्वतः कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नसतात. त्यामुळेच प्रतोद नियुक्ती पक्ष करतो. संसदीय पक्ष नाही. त्यामुळे शिंदे ठाकरे खटल्यात शिंदे गटाने मांडलेले सर्व मुद्दे निरर्थक ठरतात, असे ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी स्पष्ट केले.

15:44 March 16

अमृता फडणवीस लाच व ब्लॅकमेल प्रकरण; तपास योग्यरित्या सुरू आहे - देवेंद्र फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची योग्य ती चौकशी केली जाईल.

15:43 March 16

ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरल्याने ड्रायव्हरसह हमालाचा मृत्यू

नाशिक - शेणखताची वाहतूक करणाऱ्या मालट्रकमध्ये रस्त्यातील वीज तारेचा प्रवाह उतरल्याने यात ड्रायव्हर आणि हमालाच मृत्यू झाला आहे, तर एक हमाल किरकोळ जखमी झाला आहे. निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी घडली.

15:29 March 16

भारत कोल कंपाऊंडची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव - नाना पटोले

मुंबई - कुर्ला परिसरात असणारी भारत कोण कंपाऊंड ही कंपनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न बी एम सी चे अधिकारी आणि स्थानिक पोलीस करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 1966 पासून भारत कॉल कंपाऊंड येथे छोटे छोटे जवळपास 100 गाळाधारक आहेत. या काळातून छोटे-मोठे उद्योग धंदे तेथील व्यापारी करतात. या गाळ्यांमध्ये जवळपास साडेचार हजार कामगार सध्याच्या परिस्थितीत काम करत आहेत. जवळपास वीस हजार लोकांचा उदरनिर्वाह तेथे सुरू असलेल्या व्यवसायावर होत आहे.

15:11 March 16

अमृता फडणवीस यांना ब्लॉकमेल करणाऱ्या डिझायनर मुलीचा बाप कुप्रसिद्ध बुकी अनिल सिंघानिया

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॉकमेल करणारी डिझायनर ही उल्हासनगर शहरात राहणाऱ्या इंटरनॅशनल प्रसिद्ध बुकी असलेल्या अनिल सिंघानीयाची मुलगी आहे. तिचे वडील गेल्या ८ वर्षापासून पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आता याप्रकरणातील आरोपी असलेल्या अनिक्षा सिंघानीयाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक उल्हासनगर शहरात अनिक्षाच्या घरी दाखल झाले आहे. अनिक्षा आणि तिच्या भावालाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

14:17 March 16

अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ चीता हेलिकॉप्टरचा अपघात

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टरचा आज सकाळी 09:15 च्या सुमारास ATC शी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. बोमडिला पश्चिमेकडील मंडाळाजवळ हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. शोध पक्ष सुरू केले आहे, असे लेफ्टनंटनी सांगितले.

13:58 March 16

ईडीसंदर्भात छगन भुजबळ यांच्यावरील आजची सुनावणी टळली

मुंबई - छगन भुजबळ यांची आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. सत्र न्यायालयात ईडीने त्यांच्या विरोधात आरोप याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.

13:45 March 16

एमआयएमच्या भूमिकेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर - शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. संस्था गणपती ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवला. अवघ्या 200 ते 250 मीटरवर हा मोर्चा आडवत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एमआयएम खासदार इम्तियाज जलील नामांतराच्या मुद्यावरून करत असलेल्या आंदोलन विरोधात हा मोर्चा मनसेने काढला होता.

13:30 March 16

मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी कोसळल्या, विषाणु संसर्गाचेही वाढले प्रमाण

मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात गुरुवारी हलक्या सरी पडल्या आहेत, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले. या पावसामुळे राज्यातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला शहरात आतापर्यंतच्या हंगामातील सर्वाधिक तापमान – ३९.४ अंश सेल्सिअस नोंदवल्यानंतर पाऊस पडत आहे. अशा वेळी जेव्हा राज्यात इन्फ्लूएंझा प्रकरणे आणि विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

13:29 March 16

एप्रिलपर्यंत 30 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या 30,000 रिक्त जागा भरल्या जात आहेत. एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

13:22 March 16

नगरपरिषद आणि संवर्ग कर्मचारी संघटनेचे ६० हजार कर्मचारी संपातून बाहेर

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि संवर्ग कर्मचारी संघटनेने संपामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे 60 हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसहीत विविध मागण्यासाठी संपावर होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, सुरेश पोसतांडेल,चरण सिंग टाक, नागेश कंदारे,विश्वाथ घुगे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने या संघटनेने संपातुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

13:02 March 16

ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष :पहिल्या टप्प्यातील सुनावणी संपली, 2 वाजता पुढील सुनावणी

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात आज पहिल्या टप्प्यातील शिंदे-ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी संपली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या मुद्यांचा प्रतिवाद आज केला. आता लंच ब्रेक झाला आहे. दुपारी 2 वाजता पुन्हा पुढील सुनावणी सुरू होईल.

12:30 March 16

पालघरमध्ये महिलेच्या घरातून ९.३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पालघर - एका महिलेच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी 9.3 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले, असे पोलिसांनी सांगितले. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी मुंबईच्या बाहेरील नालासोपारा येथील विजय नगर परिसरातील महिलेच्या घराची झडती घेतली. त्यावेळी हे आढळून आले

12:18 March 16

घटनात्मक बाबी बाजूला सारून मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यपालांचा उपयोग करुन घेतला - सिब्बल

नवी दिल्ली - युक्तीवादामध्ये स्पष्टता यावी यासाठी सरन्यायाधीशांसह इतर घटनापीठ सजग असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. सिब्बल यांचा युक्तीवाद सुरू असताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, राज्यपाल सरकारला उत्तरदाई असले पाहिजेत. तसेच बहूमत असले पाहिजे, असे तुम्ही सांगत आहात. मग असे आता समजा सरकारकडे आमदारांची संख्या एक संख्या आहे. उदाहरणार्थ एका पक्षातील काही प्रतिनिधींचे असे मत आहे की त्यांचा सरकारवर विश्वास नाही. ते आपल्या म्हणण्यावर एवढे ठाम आहेत की, अपात्रता मान्य आहे मात्र आमचा सरकारवर विश्वास नाही. अशा परिस्थितीत तुमच्या तर्कानुसार, राज्यपाल कधीही विश्वासदर्शक ठराव घेऊ शकत नाहीत. पण अशा परिस्थितीत सरकारकडे बहूमत नसताना राज्यपालांनी असे सरकार सुरू ठेवावे काय, जे अल्पमतात आले आहे. यावर उत्तर देताना सिब्बल म्हणाले की सध्या सत्र सुरू आहे. वित्त विधेयक मंजूर करायचे आहे. ते विरोधात मतदान करु शकतात आणि सरकार पाडू शकतात. त्यात काय अडचण आहे? कारण त्यांना काय हवे आहे, त्यांना सरकार पाडायचे आहे, मुख्यमंत्री व्हायचे आहे- मात्र हे घटनात्मकदृष्ट्या ते योग्य नाही. मात्र हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी राज्यपालांचा वापर केला, असे स्पष्टीकरण सिब्बल यांनी दिले.

12:04 March 16

आयाराम-गयारामचे राजकारण थांबवण्यासाठीच दहाव्या परिशिष्ठाची रचना

नवी दिल्ली - सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना विचारुन एक गोष्ट स्पष्ट केली. ते म्हणाले, सरकारिया आयोगाच्या अहवालाचा विचार करता अपक्षांच्या पाठिंब्याने निवडणूकोत्तर युती हा एक पक्ष होतो. त्यामुळे तुमच्या मते युतीमधील सदस्य वेगळे झाले तरच राज्यपाल फ्लोअर टेस्ट कॉल करू शकतात. असेच म्हणावे का? त्यावर सिब्बल यांनी होय असे सांगून त्याचसाठी दहाव्या परिशिष्टाची रचना करण्यात आली. कारण त्यापूर्वी अशा प्रकारे आयाराम-गयारामचे राजकारण सुरू होते.

11:44 March 16

लोकप्रतिनिधींना नाही तर पक्ष आणि पक्षादेशाला घटनेने मान्यता दिली आहे - सिब्बल

नवी दिल्ली - जर राज्यपाल त्यांच्याकडे आलेल्या प्रतिनिधींचे ऐकून निर्णय घेत असतील तर आयाराम-गयारामांचेच राजाकारण सुरू होईल. तेच घटनेला आणि लोकशाहीला मान्य नाही. म्हणूनच असा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्ष आणि पक्षादेश यांना प्रामुख्याने घटनेने मान्यता दिली आहे. राज्यपालांनी पक्षाला विचारात घेतले पाहिजे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना नाही, असा कायदा आहे. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले गेल्याचे सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले.

11:40 March 16

राज्यपालांनी अनेक घटनात्मक-संबंधित कायदे आणि नियमांची केली पायमल्ली - सिब्बल

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाच्या वतीने अंतिम प्रतिवाद सुरू आहे. शिंदे गटाने उपस्थित केलेल्या मुद्यांना ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल जोरदारपणे खोडून काढत आहेत. राज्यपालांनी अनेक घटनात्मक बाबींची तसेच संबंधित कायदे आणि नियमांची पायमल्ली केल्याचे ते मुद्देसूदपणे तसेच प्रत्येक निर्णय कसा चुकीचा होता याचा एक-एक दाखला देत त्यांचा युक्तीवाद सुरू आहे.

11:09 March 16

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांनी अधिवेशन चालू असताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. चूल पेटवून विरोधकांनी महागाईवरून संताप व्यक्त केला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील विरोधकांनी केली आहे.

10:29 March 16

ठाकरे गटाकडून आज कपिल सिब्बल करणार युक्तीवाद

शिंदे व ठाकरे यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे.

09:58 March 16

लोकमान्य नगर येथील चाळीत घराला लागली आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही!

ठाणे शहरातील एका घराला गुरुवारी सकाळी आग लागली आणि तासाभरात ती आटोक्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकमान्य नगर येथील चाळीत घराला सकाळी 7.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

09:54 March 16

राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे-किरेन रिजिजू

राहुल गांधी यांनी लंडनच्या चर्चासत्रात जे काही बोलले त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी आपल्या लोकशाहीचा, न्यायव्यवस्थेचा आणि देशाचा अपमान केला आहे. आपल्या देशाविरुद्ध बोलणाऱ्यांविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.

09:54 March 16

कोडाईकनाल वनपरिक्षेत्रात १५ मार्च रोजी भीषण उष्णतेमुळे लागलेल्या आगीत १० हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्र नष्ट झाले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

09:37 March 16

तिसऱ्या दिवशीही सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, मनपा व नगरपरिषद कर्मचारी संघटनांची संपातून माघार

सलग तिसऱ्या दिवशी सरकारी कर्मचारी संघटनांचा संप सुरू असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा केल्यानंतर मनपा व नगरपरिषद कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

09:28 March 16

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पूंछ जिल्ह्यातील नवग्रह मंदिराला दिली भेट

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पूंछ जिल्ह्यातील नवग्रह मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

09:15 March 16

वडिलांना खटल्यातून बाहेर काढण्यासाठी गृहमंत्र्यांच्या पत्नीला १ कोटी लाच देण्याचा प्रयत्न?

अनिक्षा या डिझाईनविरोधात धमकी आणि कट रचल्याचा अमृता फडणवीसांकडून आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्यानंतर मुंबईतील मलबार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:05 March 16

८६५ सीमावर्ती गावांमधील आरोग्य विमा योजना रोखण्यासाठी कर्नाटक सरकार करणार प्रयत्न

८६५ सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकार आरोग्य विमा योजना देणार आहे. ही योजना रोखण्यासाठी कर्नाटकचे बोम्मई सरकार उपाययोजना करणार आहे, ही माहिती खुद्द मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली आहे.

08:58 March 16

गणितासह आणखी दोन विषयांचे पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर, कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना अटक

बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचेही आणखी पेपर फुटल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान ज्युनियर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना अटक करून मोबाईल जप्त करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

07:50 March 16

ऐन उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखी दोन दिवस पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

07:48 March 16

नागपुरातील त्या व्यक्तीचा मृत्यी H3N2 ने नाही, डेथ ऑडीटमध्ये स्पष्ट

नागपुरात H3N2 चा संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वृद्धाचा मृत्यू H3N2 ने झाला नसल्याचे डेथ ऑडीटमध्ये स्पष्ट झाले आहे.

07:36 March 16

मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन रवी चौधरी वायुसेनेचे सहाय्यक सचिव होणार

व्हर्जिनिया येथील मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन रवी चौधरी हे अमेरिकन वायुसेनेचे सहाय्यक सचिव होणार होणार आहेत. त्यामुळे भारताची मान अजून जगभरात उंचावणार आहे.

07:35 March 16

गोव्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ई-चलन प्रणाली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी गोव्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक व्यवस्थापन आणि ई-चलन प्रणाली सुरू केली. वाहतूक आणि सुरक्षा सुरळित करण्यासाठी गोव्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. गोव्यात एकूण 16 सिग्नल सुरू केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

07:33 March 16

वंदे भारतची पहिली महिला चालक सुरेखा यादवने पंतप्रधानांचे मानले आभार

गेल्या 34 वर्षांपासून काम करत आहे. आई-वडिलांचा आणि सासरच्या मंडळींचा पाठिंबा मिळाला. वडिलांनी मला चांगले शिक्षण दिले त्यामुळे मी येथे पोहोचू शकले. वंदे भारत मुंबईत आणल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते, अशी सुरेखा यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या आशियातील पहिल्या लोको पायलट चालक आहेत. त्या आता वंदे भारतच्या पहिल्या महिला चालक आहेत.

07:10 March 16

हैदराबादमध्ये बीआरएस विरुद्ध भाजपचे रंगले पोस्टर वॉर

ईडीच्या एमएलसी के कविता यांच्या चौकशीपूर्वी आता हैदराबादमध्ये बीआरएस विरुद्ध भाजपचे पोस्टर वॉर रंगू लागले आहे. पोस्टर्समध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांना गुन्हेगार आणि 'वॉन्टेड' दाखवण्यात आले आहे. हैदराबादमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी हे पोस्टर दिसून आले आहे.

07:09 March 16

दिल्लीत कारखान्याला लागली भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

वजीरपूर औद्योगिक परिसरात एका कारखान्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत. घटनास्थळी 12 वाहने आहेत. येथे मेटल आणि प्लास्टिकचे काम केले जाते. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने म्हटले आहे.

07:07 March 16

मुंबईत २४ तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांची आत्महत्या

उपनगरातील कांदिवली येथील एका इमारतीत काही तासांतच झालेल्या दोन घटनांमध्ये 18 वर्षीय मुलगा आणि 56 वर्षीय महिलेसह दोन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलगी आई होऊ शकली नाही या नाराजीमुळे महिलेने मंगळवारी तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. 18 वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांनी अभ्यास करत नसल्याबद्दल आरडाओरड केल्याने इमारतीवरून उडी मारली. त्याचा मृतदेह इमारतीतील वॉचमन आणि सोसायटीच्या सदस्यांनी पाहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

06:34 March 16

Maharashtra Breaking News : बिबट्याचा बंदोबस्त करा, चिमुकलीला ठार केल्यानंतर नाशिक जिल्हयात नागरिकांची मागणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर ब्राह्मणवाडे येथे साडे तीन वर्षाची बालिका घराच्या अंगणातून बिबटयाने झडप घालून उचलून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Last Updated :Mar 16, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.