ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत ३ वर्षांतून आता तिसऱ्यांदा कोरोना रुग्णांची शून्य नोंद

author img

By

Published : Jan 27, 2023, 10:09 PM IST

For The Third Time in 3 Years Now, Zero Cases of Corona Patients have been Recorded in Mumbai
मुंबईत ३ वर्षांतून आता तिसऱ्यांदा कोरोना रुग्णांची शून्य नोंद

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणामध्ये कमी झाला आहे. यामुळे २४ जानेवारी आणि आज २७ जानेवारीला तब्बल ३४ महिन्यांनी (सुमारे ३ वर्षांनी) मुंबईत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. या आधी १६ मार्च २०२० ला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. सुमारे ३ वर्षांनी शून्य रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : मुंबईत आज २७ जानेवारीला ११९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात शून्य रुग्णांची नोंद झाली. सध्या ३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून, एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ४८० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३,६३,९३२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०००२ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४४३८ बेडस आहेत. त्यापैकी ३. बेडवर म्हणजे ०.०७ टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत उतार सुरू : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जून २०२२ ला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन गेले काही दिवस १० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे.

मुंबईत धारावी मॉडेलची दखल : मुंबईमध्ये कोरोनाचा सुरुवातीला इमारतीमधून प्रसार सुरू झाला. त्यानंतर झोपडपट्टी व दाटीवाटीच्या विभागात कोरोना रुग्ण आढळू लागले. मुंबईत धारावी येथे सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्याचप्रमाणे इतर विभागातही मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्यामध्ये कोरोना पसरल्यास मुंबईत हाहाकार झाला असता. याला रोखण्यासाठी पालिकेने धारावी मॉडेल तसेच मुंबई मॉडेल राबवले. यामुळे कोरोना आटोक्यात राहिला. तसेच शून्य मृत्यूची नोंद होऊ लागली होती. पालिका आणि आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे १६ मार्च २०२० नंतर तब्बल ३४ महिन्यांनी २४ जानेवारी आणि आज २७ जानेवारीला मुंबईत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.