मुंबई : राज्यात एकूण एसटी बसमध्ये २९ प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. त्याची प्रतीपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली आहेत. सन २०२१ व सन २०२२ मधील एकूण ३८९ कोटी येणे बाकी आहे. तर आत्तापर्यंतची एकूण अंदाजे ६०० कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. सदरची रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
सवलती मिळणार का : जर एसटी मधून प्रवास करणाऱ्या सामान्य आणि विविध प्रकारच्या दुर्बल घटकातील प्रवासांना ही मदत जर दिली तरच त्यांचा प्रवास सुखरूप होणार आहे. कारण समाजातील महत्त्वाचे सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातून जे प्रवासी येतात त्यांच्यासाठी या सवलती दिल्या जातात. मात्र त्याची रक्कम थकीत असल्यामुळे येत्या काळात या सवलती मिळणार आहेत का असा प्रश्न यातून निर्माण होतो.
सक्षम करण्याच्या निव्वळ गप्पा : एसटी बसमधून समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामध्ये २९ प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. सवलतीच्या संपूर्ण रक्कमेची प्रतिपूर्ती सरकार करीत असून साधारण वर्षाला १६०० कोटी रुपये इतकी रक्कम सरकार महामंडळाला अनेक वर्षे देत आहे. पण सरकारने गेले काही महिने यातील एकही पैसा दिला नसून एसटी सक्षम करण्याच्या निव्वळ गप्पा मारल्या जात आहेत. असेही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बरगे यांनी म्हंटले आहे.
एसटी कामगार संघटना राज्याध्यक्षांचा आरोप : राज्य परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील मोठे महामंडळ आहे. परंतु या महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घालत आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे महामंडळ प्रचंड अडचणीत आले आहे. लाल परीला ग्रहण लागले आहे. चुकीच्या नेतृत्वामुळे एसटी महामंडळावर हा संप लादला गेला.
एकतर्फी पॅकेज जाहीर : सन २०१६-२०२० च्या कामगार करारासाठी शासनाने ४ हजार ८४९ कोटीचे पॅकेज एकतर्फी जाहिर केले. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय दराने घरभाडे, भत्याचा दर ८१६ म्हणजे २४ टक्के, तर वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के लागू होता. परंतु ४ हजार ८४९ कोटीची वेतनवाढ जाहिर करताना घरभाडे भत्याच्या दरामध्ये ८, १६, २४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी केला. तसेच जाहिर झालेल्या ४ हजार ८४९ कोटीचे एकतर्फी वाटप करताना शिल्लक असलेल्या रक्कमेचेही वाटप कामगारांना न झाल्यामुळे करारावर संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही.
हेही वाचा : ST Worker Strike : गुणरत्न सदावर्तेंनी आमच्या भावनांचा खून केला; एसटी कामगार संघटना राज्याध्यक्षांचा आरोप