ETV Bharat / state

Balasaheb Thackeray Death Anniversary: व्यंगचित्रकार ते हिंदुत्त्वाचा बुलंद आवाज! 'असा' राहिला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 7:23 AM IST

Balasaheb Thackeray Death Anniversary
Balasaheb Thackeray Death Anniversary

Balasaheb Thackeray Death Anniversary : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! आपल्या रोखठोक विधानांमुळं ते नेहमीच चर्चेत रहायचे. एकदा बोललेला शब्द त्यांनी कधी वापस घेतला नाही. पक्ष वाढवला, सत्तेत आणला आणि शेवटपर्यंत आपला झंझावात कायम ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे.

मुंबई Balasaheb Thackeray Death Anniversary : बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आयुष्यभर लढणारं व्यक्तिमत्व! मराठी माणसांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी ते चर्चेत रहायचे. मात्र, त्यांनी कधीही कोणाचीही पर्वा न करता आपली मतं प्रत्येक मुद्द्यावर नेहमीच परखडपणे मांडली. बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज अशी ओळख होती. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कसलीही पर्वा न करता आपली परखड मतं मांडली. महाराष्ट्रातच मराठी माणसाची होणारी गळचेपी, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद असो, बाबरी मशिदीचा मुद्दा असो, किंवा थेट पाकिस्तानबाबतची भूमिका असो, बाळासाहेबांची तोफ धडधडत राहिली. त्यामुळं ते नेहमीच मराठी माणसासहित तमाम देशातील नागरिकांच्या गळ्यातलं ताईत बनून राहिले. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वादळं उभी केली. आज त्याच बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेऊया.

घरातूनच मिळाले बाळकडू : बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसंच एक पत्रकारदेखील होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनही ओळखलं जातं. एकूण नऊ भावंडांपैकी बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे होते. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रस्थानी होते. त्यामुळं मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.

  • वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/90s53ndChi

    — ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मार्मिक हे साप्ताहिक सुरु : पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी 'फ्री प्रेस जनरल' या इंग्रजी वृत्तपत्रातून केली. या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली. यासोबतच इंग्रजी वृत्तपत्रातदेखील त्यांनी काढलेले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. 13 जून 1948 ला बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न मीनाताई ठाकरे यांच्याशी झालं. नोकरीमध्ये त्यांना रस वाटत नव्हता म्हणून 1960 साली त्यांनी आपलं स्वतःचं मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं. मार्मिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि मराठी माणसाचे प्रश्न त्यांनी समोर आणण्यास सुरुवात केली.

न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना : महाराष्ट्रात त्यावेळी वाढणारी गैरमराठी लोकांची लुडबुड यावर भाष्य करणारी अनेक व्यंगचित्र त्यांनी मार्मिकमधून प्रसिद्ध केली. महाराष्ट्रातच मराठी माणसावर होणारा सततचा अन्याय, शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात मराठी तरुणांची होणारी फरपट पाहून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी एक संघटना हवी, असा विचार बाळासाहेबांच्या डोक्यात आला. त्यातूनच त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरूवातीच्या काळात शिवसेना हा राजकीय पक्ष नसून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना होती.

मनोहर जोशी यांना बनविले पहिले मुख्यमंत्री : 19 जून 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात असलेल्या अनेक छोटे मोठे राजकीय पक्षांशी हातमिळवणी करत त्यांनी राज्यभर हा पक्ष पसरवला. यादरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षा सोबत युती करुन राज्यात 1995 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार सत्तेवर आणलं. बाळासाहेब ठाकरे यांनी युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी यांना पहिले मुख्यमंत्री बनवले.

17 नोव्हेंबर 2012 साली अनंतात विलीन : आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळं बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे. अशाचं एका वादग्रस्त वक्तव्यामुळं निवडणूक आयोगानं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर थेट मतदानासाठी सहा वर्षाची बंदी आणली होती. 11 डिसेंबर 1999 ते 10 डिसेंबर 2005 याकाळात बाळासाहेबांवर मतदानासाठीची बंदी होती. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास 17 नोव्हेंबर 2012 रोजी थांबला. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा आघात होता. कधीही न थांबणारी मुंबई त्यादिवशी पूर्णपणे शांत होती.

हेही वाचा :

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
  2. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.