ETV Bharat / state

26/11 दहशतवादी हल्ला : कसाबला कसं जिवंत पकडलं ? निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 1:24 PM IST

Updated : Nov 26, 2023, 2:29 PM IST

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचा अंगावर काटा आणणारा थरार निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी सांगितलाय.

26/11 दहशतवादी हल्ला
26/11 दहशतवादी हल्ला

निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर

मुंबई 26/11 Mumbai Terror Attacks : 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पुर्ण झाली आहेत. या हल्ल्यावेळी पोलिसांना अजमल कसाब या एकमेव जिवंत दहशतवाद्याला पकडण्यात यश आलं. त्या हल्ल्यात निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.


हल्ल्यात 166 नागरिकांची हत्या : 26 नोव्हेंबर 2008 ला 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात 166 निष्पाप नागरिक व सुरक्षा रक्षकांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली होती. 15 वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि भळभळीत जखमा अजूनही ताज्या आहेत. या हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाबला जिवंत पकडून देताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले. मात्र, गिरगाव चौपाटीवर शहिद ओंबळे यांच्यासह संजय गोविलकर, भास्कर कदम, हेमंत बावधनकरसह 16 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कसाबला जिवंत पकडून देण्यात महत्वाचं योगदान दिलंय.


कसाबची स्कोडा गाडी थांबली अन् : कसाबला जिवंत पकडल्याच्या थराराबाबत सांगताना निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी सांगितलं की, हल्ला झाला तेव्हा वेळी हुतात्मा ओंबाळे गिरगाव चौपाटीवर ड्यूटीवर होते. यावेळी आणखी काही सहकारी चौपाटीवर पोहोचले. नाकाबंदीदरम्यान कसाब व त्याच्या साथीदार अबू इस्माईल गोळीबार करत स्कोडा कारमधून येत होते. जेव्हा कसाब व त्याचा साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहोचला. तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला अडवत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबच्या साथीदारानं ओंबाळेवर गोळ्या झाडल्या. विधान भवनाकडून रायफलच्या धाकावर चोरलेली स्कोडा कार घेऊन दहशतवादी मलबार हिलच्या दिशेनं निघाले होते. साडेबाराच्या ठोक्याला ही कार गिरगाव चौपाटीकडे अडवण्यात आली. तेव्हा कारच्या बाहेरील हेडलाइट बंद करुन आतील लाइट सुरू करण्याच्या आम्ही सूचना दिल्या. मात्र इस्माईलनं अप्पर लाइट मारल्यानं तो प्रकाश डोळ्यावर आल्यानं पोलिसांना गाडीचा नंबर दिसत नव्हता. पोलीस गाडीभोवती येत असल्याचं पाहून इस्माईलनं ती वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी कार दुभाजकाला धडकून कारचं चाक जाम झालं. रागाच्या भरात इस्माईलनं पोलिसांवर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईलचा मृत्यू झाला. ही बाब बाहेरच्या पोलिसांना माहिती नव्हती, असा थरार हेमंत बावधनकर यांनी सांगितला.



तुकाराम ओंबळेमुळेच आम्हाला जीवनदान : पुढं बोलताना बावधनकर म्हणाले की, अबू इस्माईलनं आमच्यादिशेनं गोळीबार केला. त्यावेळी आमचे सहकारी भास्कर कदम यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्या दहशतवाद्याला प्रत्युत्तर देत गोळीबार करून अबू इस्माईलला जखमी केलं. कसाब गाडीत डाव्या बाजूला बसलेला होता. कसाब दरवाजा उघडून बाहेर आला. त्याचवेळेला त्याला घेराव घालायला आमचे सहकारी संजय गोविलकर, तुकाराम ओंबळे जात होते. तेव्हा कसाबनं एके 47 मधून गोळीबार केला. इस्माईलच्या गोळीबारात तुकाराम ओंबळे गंभीर जखमी झाले. ओंबळे यांनी आमचे प्राण वाचवून स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या. यात ओंबळे हुतात्मा झाले. तुकाराम ओंबळे यांच्यामुळं आम्ही उर्वरित 15 जण जिवंत राहू शकलो, अन्यथा चित्र काही वेगळंच राहिलं असतं. सर्व गोळीबार स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी आम्हाला जीवनदान दिलं, असा अंगावर काटा आणणारा अनुभव हेमंत बावधनकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला.

हेही वाचा :

  1. मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष; आजही जखमा ताज्या
  2. 26/11 नंतर मुंबईत कशी आहे सुरक्षाव्यवस्था? जानेवारीपर्यंत बसविण्यात येणार साडेपाच हजार सीसीटीव्ही
  3. ‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी
Last Updated :Nov 26, 2023, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.