ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे लातुरात ७४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

author img

By

Published : Sep 23, 2020, 7:25 PM IST

अतिवृष्टी लातूर
अतिवृष्टी लातूर

काढणीला १५ दिवसांचा अवधी असतानाच जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील ६०पैकी २३ मंडळात अतिवृष्टी झाली. सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. विशेषतः, उदगीर, निलंगा, औसा तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

लातूर - गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरिपातील तब्बल ७४ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सोयाबीन या मुख्य पिकाला मोठा फटका बसला असून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. पंचनामे केल्यानंतर सर्व स्थिती समोर येणार आहे.

माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख १४ हजार हेक्टर आहे. यापैकी तब्बल ४ लाख ५९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा हंगामाच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण होते, मात्र पिके बहरताच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. खरिपातील पिके पाण्याविना सुकू लागली होती. परंतु, गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे, खरिपातील तूर, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके पाण्यात आहे.

सोयबीन पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकरण अवलंबून असते. गतवर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला होता. परंतु, काढणीला १५ दिवसाचा अवधी असतानाच जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील ६०पैकी २३ मंडळात अतिवृष्टी झाली. सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. विशेषतः, उदगीर, निलंगा, औसा तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

पावसापूर्वी उडीद, मुगाची काही प्रमाणात का होईना काढणी झालेली आहे. परंतु, सोयाबीन अद्यापही शेतातच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे, शेतकरी संघटना सरसकट नुकसान झाल्याचे ग्राह्य धरत हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी करीत आहे. सरकारच्या तुटपुंज्या मदतीने नुकसान भरून निघणार नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या प्रश्नी राज्य सरकार अपयशी; भाजपाचे लातुरात धरणे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.