कोल्हापूर - राज्य सरकारच्या 'ब्रेक दी चेन' या नव्या मोहिमेनुसार राज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर देखील बंद करण्यात आले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी मंदिर परिसरातून आढावा घेतला...
राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी -
राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक दी चेन' मोहिम सुरू केली आहे. यासाठी नियमावली जाहीर करून विकेंडला कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या नविन नियमांमध्ये पुन्हा एकदा राज्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री आठ वाजल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारी सर्व मंदिरे कालपासून बंद करण्यात आली आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर देखील कालपासून बंद करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी केली जात असून आज(मंगळवार) सकाळी मंदिर परिसर भाविक व पर्यटकांसाठी बंद होता. भाविकांनी प्रवेश द्वारापासूनच दर्शन घेतले. देवस्थान समितीने प्रवेशद्वारासमोर देखील सामाजिक आंतर, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
व्यापाऱ्यांमध्ये नाराजी -
दरम्यान, गेल्या वर्षभराच्या कालावधीत मंदिर परिसरातील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. जानेवारीपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्यानंतर काही अंशी व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा मंदिर बंद केल्याने मंदिर परिसरातील दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारी सर्व मंदिरे बंद करण्यात आल्याने यंदाची जोतिबा चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने जाहीर केला आहे.
हेही वाचा - 'नक्षलवाद्यांच्या भ्याड टीसीओसीला उत्तर देण्यास महाराष्ट्र पोलीस समर्थ'