कोल्हापूर - राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र, यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने 'लॉंग टर्म' विकास केला नाही. दरवर्षी तेच-तेच ठेकेदार नेमायचे. केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून काम करावे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत शिवसेनेने विचार केला पाहिजे. आम्ही सत्तेत असताना पनवेल-सायन मार्गावर खड्डे का पडतात, याचा बारकाईने विचार करून त्यावर कायमचा तोडगा काढला. मात्र, शिवसेना असा का विचार करत नाही? असा प्रश्न पाटील यांनी केला. राज्यात पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शक्य असेल तर, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ घरात बसून चालणार नाही, मातोश्रीच्या बाहेर यावे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ सात तास काम करून चालत नाही, १८ तास काम करावे लागते. महापौर निवासस्थानी बैठका घेऊन चालत नाहीत, त्यासाठी मंत्रालय, वर्षा बंगला आहे, असा टोला देखील पाटील यांनी लगावला.
हेही वाचा - मराठा आरक्षण: मंत्रिमंडळ निर्णयाचे भाजपकडून स्वागत, अंमलबजावणीची केली मागणी