जालना - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वर गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त होणारी गर्दी पाहता चतुर्थीला हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन मार्चला अंगारकी चतुर्थी -
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून भोकरदन तालुक्यातील राजूर येथील राजुरेश्वर गणपती सर्वदूर परिचित आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. अंगारकी चतुर्थीला याठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यावर्षी येत्या 2 मार्चला अंगारकी चतुर्थी आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राजुरेश्वर गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 15 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अंगारकी चतुर्थीनिमित्त 1 मार्चला सायंकाळी ते 2 मार्चला रात्री उशिरापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - माघी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास
नऊ महिने मंदिर बंद -
मार्च 2020मध्ये कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी झाल्यानंतर दिवाळीच्या पाडव्यापर्यंत सुमारे नऊ महिने हे मंदिर बंद होते. यादरम्यान, गणेश भक्तांना दर्शन मिळाले नाही. अखेर शेवटी भाविकांनी पायरीचे दर्शन घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला हे मंदिर खुले झाले. आतापर्यंत 4 चतुर्थीला गणेश भक्तांना हे दर्शन मिळाले. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वर्षातून एकदा येणाऱ्या अंगारकी चतुर्थीलाही भाविकांना गणपती बाप्पाचे दर्शन मिळणार नाही.