जालना - गेल्या आठ महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ढेपाळलेली आहे. कोणाचाही कोणावर वचक राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचे खच्चीकरण होणारे निर्णय घेतले जात आहेत. निलंबनाच्या कारवाई होत आहेत. या सर्व कारवायांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे जालना दौऱ्यावर आले आहेत. पोलीस मुख्यालयातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.
पोलीस यंत्रणा निघाली ढवळून -
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली झाल्यानंतर आठ महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पदभार घेतला. यानंतर दोन-तीन महिन्यांनी बदल्यांचे सपाटे सुरू झाले. एका ठिकाणचा पदभार घेतल्यानंतर लगेच पुन्हा आठ दिवसात दुसऱ्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची बदली होत असल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्यांनी तीस वर्ष सेवा दिली आहे आणि आता सेवानिवृत्तीकडे वाटचाल करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीदेखील अजून झालेली नाही. त्यातच मागील महिन्यामध्ये पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर पोलीस यंत्रणा ढवळून निघाली.
हेही वाचा - पासपोर्ट रिन्यू करण्याच्या मागणीसाठी कंगना रनौतची मुंबई उच्च न्यायालयात धाव
पोलीस महानिरीक्षकांकडून आढावा -
दरम्यान, या प्रकरणानंतर अवघ्या पंधरा दिवसातच आणखी गोंदी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात सापडला. कदीम जालना पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. आरोपीला पकडण्यासाठी जाफराबाद येथील भाजप कार्यालयात गेलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाही काल (सोमवारी) 14 जूनला निलंबित करण्यात आले. या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. या सर्व प्रकारचा आढावा घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे जालन्यात आलेले आहेत.