ETV Bharat / state

घर-दार सर्वस्व हिरावलं, फक्त अंगावरचे कपडे उरले! जगावं कसं? डोंगरी नदी पूरग्रस्त बागुल कुटुंबाला भावना अनावर

author img

By

Published : Sep 2, 2021, 11:24 AM IST

Updated : Sep 2, 2021, 12:16 PM IST

डोंगरी नदीच्या पुरामुळं विश्वजित दौलतराव बागुल यांचं संपूर्ण घर पाण्यात वाहून गेलं आहे. तसंच, 10 शेळ्या, 2 बोकड, 1 गायही वाहून गेली. यामुळे बागुल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांनी आपली व्यथा ईटीव्ही भारतसमोर मांडली आहे. यातून प्रशासनाला मदतीची आर्त हाक दिली आहे. वाचा सविस्तर...

बागूल यांच्या घराचं नुकसान
बागूल यांच्या घराचं नुकसान

जळगाव : 'रक्ताचे पाणी करून संसार उभा केला होता. आता कुठे चांगले दिवस आले होते. पण अतिवृष्टीमुळे डोंगरी नदीला पूर आला आणि आमचं घर-दार, पशुधन वाहून गेलं. पाणी प्यायला साधा एक ग्लासही उरलेला नाही. अंगावरचे कपडे तेवढे उरलेत. आता पुढे कसे जगायचे? हा खरा प्रश्न आहे. या पुराने तर आमचे सर्वस्व हिरावून नेलं आहे', या भावना आहेत; विश्वजित दौलतराव बागुल यांच्या... डोंगरी नदीला आलेल्या पुरात त्यांचे घर-दार वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 'त्या' काळरात्रीचा थरार 'ईटीव्ही भारत'कडे कथन करताना बागुल कुटुंबीयांना गहिवरून आले.

बागुल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच

घर-दार, शेती सगळं पाण्यात

विश्वजित बागुल (वय 38 वर्षे) हे चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावचे रहिवासी. आई लिलाबाई, पत्नी अनिता आणि भूमिका व दीक्षा यांच्यासोबत ते राहतात. शेती आणि कृषी केंद्र चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला. डोंगरी नदीला आलेल्या पुरात त्यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. तर घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय. अंगावर कपडे तेवढे उरलेत. दैव बलवत्तर म्हणून बागुल कुटुंबीयांचा जीव बचावला आहे. पण सर्वस्व हिरावल्याने आता पुढे काय? हा एकच गहन प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काही तासांपूर्वी दिमाखात उभे असलेले, छानशी रंगरंगोटी केलेले बागुल कुटुंबीयांचे दोन रुमचे टुमदार घर आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे. हे घर कोसळलेले नाही तर बागुल कुटुंबीयांचे स्वप्नच विखरून पडलंय. त्यांची शेतीही पुरात उद्ध्वस्त झाली आहे.

बागूल कुटुंबाचं घर गेलं पाण्यात
बागूल कुटुंबाचं घर गेलं पाण्यात

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री अनुभवलेला थरार कथन करताना विश्वजित बागुल यांनी सांगितले, की 'सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे मी कृषी केंद्राचे काम आटोपून घरी आलो. कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर मी मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने काही पैसे दुसऱ्याला पाठवले. बाहेर पाऊस सुरू असल्याने रात्री दीड वाजेपर्यंत झोप आली नव्हती. पण नंतर केव्हा डोळा लागला कळले नाही. त्यानंतर माझ्या डोक्याजवळ ठेवलेल्या मोबाईलवर लागोपाठ 3 ते 4 मेसेज आले. त्यामुळे मला जाग आली. तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. बाहेर नदीच्या पाण्याचा जोरात खळखळाट सुरू होता. तो आवाज ऐकून मी घराबाहेर आलो. पाहिले तर घराच्या ओट्यापर्यंत पाणी आले होते. ते पाहून मी घाबरलो. घरात येऊन पत्नी, दोन्ही मुली, भाचा भूषण आणि आईला उठवले. नदीचे पाणी घरात घुसले म्हणून आपण बाहेर पडू, असे त्यांना सांगितले. पण ते नकार देत होते. याच वेळी घराच्या पुढच्या दरवाज्यातून पाणी आतमध्ये शिरले. आता घरात थांबलो तर मरून जाऊ, म्हणून मी सर्वांना मागच्या दरवाज्याने बाहेर काढले. मुसळधार पाऊस सुरू होता. तशा पावसातच आम्ही शेताच्या एका कोपऱ्याने बाहेरील रस्त्याकडे जाऊ लागलो. कंबरेपर्यंत पाणी असल्याने मी दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन पुढे चालत होतो. माझ्या मागे पत्नी, आई आणि भाचा चालत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. पाण्याचा जोर वाढतच होता. अशातच सकाळ झाली. त्यानंतर रोकडे गावातील दुधवाला मित्र आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. डोंगरी नदीला भला मोठा पूर आला होता. सकाळी 11 वाजेर्यंत नदीचा पूर ओसरलेला नव्हता. घराची काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी मी घराकडे आलो. पण दूरवरून नदीत वाहून आलेले साहित्य, कचरा, लाकडे यामुळे घर दिसतच नव्हतं. सायंकाळी पुराचा जोर ओसरल्यानंतर पाहिले तर जागेवर घर नव्हते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण घर वाहून गेले होते'. एवढे बोलून विश्वजित बागुल शांत झाले. त्यांच्या तोंडून शब्दच निघत नव्हते.

बागूल कुटुंबाचं घर गेलं पाण्यात
बागूल कुटुंबाचं घर गेलं पाण्यात

10 शेळ्या, 2 बोकड, 1 गाय गेली वाहून -

'माझ्या 10 शेळ्या, 2 बोकड आणि 1 गाय हे पशुधन देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. गोठा देखील पूर्णपणे उदध्वस्त झाला. गोठ्याची पत्रे आजूबाजूला झाडांमध्ये अडकून पडली. जमीनदोस्त झालेले घर, वाहून गेलेले पशुधन पाहून माझ्या तोंडून 'परमेश्वरा मी काय पाप केलं होतं', एवढेच शब्द निघाल्याचे मला आठवते', असे बागुल यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

पाणी प्यायला ग्लासही उरला नाही हो...

विश्वजीत बागुल यांच्या आई लिलाबाई यांना तर बोलण्यापूर्वीच अश्रू अनावर झाले. हुंदके देत त्या म्हणाल्या... 'मोठ्या कष्टाने संसार उभा केला होता. माझ्या पोराचं हक्काचं घर होतं. पण डोंगरी माय कोपली आणि आमचं सर्वस्व हिरावलं गेलं. आज पाणी प्यायला साधा ग्लासही आमच्याकडे उरलेला नाही. दुसऱ्याच्या घरून त्यांचे कपडे आणून ते आम्ही घातले आहेत. एवढी दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे. सरकारने आम्हाला मदतीचा हात द्यावा', अशी मागणी लिलाबाईंनी केली.

मुख्यमंत्री काकांनी घर द्यावं, चिमुरडीची आर्त हाक

विश्वजित बागुल यांची लहान मुलगी दीक्षा ही अवघी 5 वर्षाची. तिने त्या रात्री घडलेली आपबिती अगदी स्पष्ट शब्दात कथन केली. 'त्या दिवशी रात्री आम्ही झोपलो होतो. पप्पांनी आम्हाला उठवलं. बाहेर पाऊस चालू होता. पावसात ते आम्हाला खांद्यावर बसवून बाहेर घेऊन गेले. आई, आजी, भाऊ आमच्या मागे चालत होते. आम्ही रात्री एका ठिकाणी थांबलो. दुसऱ्या दिवशी आमचं घर पडून गेलं होतं. सर्व सामान पण नव्हतं. आमची टीव्ही पण नव्हती. कपाट नव्हतं. माझी पुस्तकं, दप्तर वाहून गेलं होतं. आम्ही आता कुठं रहायचं? मुख्यमंत्री काकांनी आम्हाला घर द्यावं...' हृदय पिळवटून टाकणाऱ्या अशा शब्दांत या चिमुरडीने शासकीय यंत्रणेकडे मदतीचा हात पसरला.

हेही वाचा - दिल्लीत जोरदार पाऊस, मोडला 19 वर्षांचा रेकॉर्ड

Last Updated :Sep 2, 2021, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.