ETV Bharat / state

सराफ बाजाराला कडक निर्बंधाचा फटका; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर कोट्यवधीची उलाढाल ठप्प

author img

By

Published : May 13, 2021, 7:38 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सोने-चांदीच्या सराफ बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कडक निर्बंधामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

जळगाव - कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या व्यापारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या सराफ बाजारात एक रुपयाचीही उलाढाल होणार नाही. अशा परिस्थितीत सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. साधारणपणे 100 कोटींची उलाढाल दरवर्षी या मुहूर्तावर होत असते.

सराफ बाजाराला कडक निर्बंधाचा फटका;

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. या सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोने हे अक्षय्य मानले जाते. 'सुवर्णनगरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजारात दरवर्षी या सणाच्या दिवशी सोने खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण, गेल्या वर्षी कोरोनामुळे अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात सोने व चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहारच होऊ शकले नव्हते. यावर्षी देखील कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सराफ बाजारातील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या एक रुपयांचीही उलाढाल होऊ शकणार नाही.

अक्षय्य तृतीयेला होते 100 ते 125 कोटींची उलाढाल

सराफ व्यापाऱ्यांच्या परिस्थितीबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, जळगाव शहरात सुमारे 125 ते 150 तर संपूर्ण जिल्ह्यात दीड हजार सराफ व्यापारी आहेत. या सर्वांना कडक निर्बंधाचा फटका सहन करावा लागत आहे. अक्षय्य तृतीयेचा सण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण या मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. या दिवशी जळगावात सुमारे 100 ते 125 कोटी रुपयांची उलाढाल होते. संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा 1 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो. परंतु, कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने ही उलाढाल होणार नाही. यापुढे अजून किती दिवस दुकाने बंद असतील, याची शाश्वती नसल्याने चिंता वाढली असल्याचे स्वरूप लुंकड म्हणाले.

देणी चुकवायची तरी कशी..?

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सराफ व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. अशाही परिस्थितीत व्यापाऱ्यांना इतर खर्च सुटलेले नाहीत. प्रशासनाने आमच्यावर निर्बंध घालण्यापूर्वी थोडा वेळ किंवा नियमावलीच्या अधीन राहून सूट देण्याची गरज होती. असे झाले असते तर आम्हाला पूर्वी मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करता आल्या असत्या. कोरोनामुळे लग्नसराईवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने आलेल्या ऑर्डरही तयार आहेत. पण, दुकाने उघडता येत नसल्याने व्यवहार होऊ शकलेले नाहीत. जर या ऑर्डर रद्द झाल्या, तर आम्हाला मोठा फटका बसू शकतो. दागिने घडवणारे कारागीर, पेढीतील कर्मचाऱ्यांचे पगार, शोरूमचा मेंटनन्स, कर्जाचे हफ्ते तसेच इतर दैनंदिन देणी कशी चुकवावी? हा मोठा प्रश्न असल्याचेही स्वरूप लुंकड यांनी सांगितले.

कमोडिटी बाजार जोखमीचा, त्यात सर्वसामान्य ग्राहकाने पडू नये

एकीकडे कोरोनामुळे सराफ बाजारातील प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असले तरी कमोडिटी बाजारात मात्र, व्यवहार सुरू आहेत. आज कमोडिटी बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 200 रुपये तर चांदी प्रतिकिलो 68 हजार, असे आहेत. हे दर प्रत्येक मिनिटाला बदलत असतात. कारण कमोडिटी बाजार हा एकप्रकारे सट्टा मानला जातो. कमोडिटी बाजाराविषयी माहिती देताना स्वरूप लुंकड म्हणाले, 'गुंतवणूकदार नफ्याच्या दृष्टीने कमोडिटी बाजारात सोने व चांदीची खरेदी-विक्री गतीने करत असतात. व्यापाराचा दृष्टीने आम्हाला यात व्यवहार करावेच लागतात. पण, हे व्यवहार जोखमीचे असल्याने सर्वसामान्य ग्राहकाने यात पडायला नको. सध्या सोने व चांदीचे व्यवहार प्रत्यक्ष सुरू नाहीत. अशा परिस्थितीत कमोडिटी बाजारात व्यवहार करता येतात का, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडतो. पण, कमोडिटी बाजारात रिटेल खरेदी व विक्री होत नाही. शिवाय या बाजारातील डिलिव्हरी ही मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा शहरांमध्ये मिळते. ते सर्वसामान्य माणसाला शक्य नसल्याने त्याचा काहीही उपयोग नाही', असेही लुंकड म्हणाले.

शासनाने सकारात्मक विचार करावा

जळगावातील सराफ बाजारात दररोज किमान 50 लाख ते 1 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. पण, आजची स्थिती विचारात घेतली तर एक रुपयाचीही उलाढाल सुरू नाही. त्यामुळे सराफा व्यापारी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. कोरोनाची परिस्थिती यापुढे कशी असेल, हे निश्चित नसल्याने राज्य शासनाने काहीतरी सकारात्मक विचार करायला हवा. सध्या शहरात कडक निर्बंध असताना अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सुरू आहेत. मग, आम्हीही नियमावली पाळून व्यवहार करू शकतो. पण, आमच्यावर जी वेळ आली आहे, ती केवळ शासनाच्या आततायीपणामुळे आली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.