ETV Bharat / state

चाळीसगावातील अ‍ॅक्सिस बँकेला पुराचा फटका; हजारोंची रोकड पाण्यात, दागिनेही गाळात

author img

By

Published : Sep 7, 2021, 12:11 PM IST

Axis Bank in Chalisgaon
Axis Bank in Chalisgaon

चाळीसगावातील अ‍ॅक्सिस बँकेलाही पुराचा फटका बसला. चक्क बँकेत पाणी घुसले. त्यामुळे बँकेत गाळ साचला. यात 4 ते 5 हजार रुपयांच्या 10 व 20 रुपयांच्या नोटा भिजल्या आहेत. शिवाय, ग्राहकांचे दागिनेही भिजले आहेत. दरम्यान, लवकरच बँकेचे कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती बँकेचे क्लस्टर हेड रवींद्र खोत यांनी दिली.

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराच्या पाण्याचा फटका अ‍ॅक्सिस बँकेलाही बसला आहे. बँकेच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने हजारो रुपयांची रोकड भिजली आहे. तसेच बँकेतील लॉकरमध्येही गाळ साचला आहे. त्यामुळे ग्राहकांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चाळीसगावातील अ‍ॅक्सिस बँकेला पुराचा फटका

10 आणि 20 रुपयांच्या नोटा भिजल्या -

चाळीसगाव शहरात घाटरोड परिसरातील दयानंद कॉर्नरजवळ अ‍ॅक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेत पुराचे पाणी साचले. त्यामुळे नुकसान झाले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना बँकेचे क्लस्टर हेड रवींद्र खोत यांनी सांगितले, की 'बँकेच्या तळमजल्यावर पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे 10 व 20 रुपयांच्या नोटा असलेली सुमारे 4 ते 5 हजार रुपयांची रोकड भिजली. तसेच लॉकरमध्येही पाणी तसेच गाळ साचल्याने ग्राहकांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू भिजल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर लगेचच लॉकरची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भिजलेली रोकड तातडीने वेगळी करून ती सुकवली गेली'.

विद्युत यंत्रणेचेही नुकसान -

पुराच्या पाण्यामुळे बँकेतील विद्युत यंत्रणेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विद्युत यंत्रणा ठप्प असल्याने बँकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्राहकांची अडचण होऊ नये म्हणून तातडीने विद्युत यंत्रणा सुरळीतपणे चालू करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. बँकेतील इतर वस्तू व फर्निचरचेही पाण्यामुळे नुकसान झाले आहे. लवकरच बँकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास रवींद्र खोत यांनी व्यक्त केला.

40 लाखांची रोकड भिजल्याची माहिती चुकीची -

पुराच्या पाण्यामुळे बँकेतील 40 लाख रुपयांची रोकड भिजल्याची माहिती चुकीची आहे. पुराच्या पाण्यात बँकेची केवळ 4 ते 5 हजारांची रोकड भिजली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने रोकड वाळवण्यात आली आहे, असे सांगत रवींद्र खोत यांनी लाखोंची रोकड भिजल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

हेही वाचा - भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.