हिंगोली - कळमनुरी येथे दोन गटात झालेल्या वादात छर्र्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 47 जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - RAJEEV SATAVS WIFE प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील इंदिरा नगर भागातील बस्थानक परिसरात २२ नोव्हेंबर रोजी हातात तलवार घेऊन अचानक घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे, किरकोळ वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, एका तरुणाने छर्र्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. या घटनेमध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबार आणि तलवारबाजीमुळे कळमनुरी परिसरात दहशत पसरली. बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका ऑटोसह एका कारच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
घटनेची चौकशी सुरू
कळमनुरी येथे अचानक झालेल्या वादामुळे परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे, या वादात तलवारी तसेच, छर्र्याच्या बंदुकीचा देखील वापर करण्यात आल्याने जवळपास पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मात्र, हा वाद कशामुळे झाला? त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा - चहाच्या टपरित गॅसचा स्फोट, हॉटल जळून खाक