ETV Bharat / state

महापौरांच्या 'त्या' व्हिडिओनंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Apr 26, 2021, 7:37 PM IST

Updated : Apr 26, 2021, 9:20 PM IST

घटनास्थळ
घटनास्थळ

चंद्रपुरात कोरोनाग्रस्तांचा व कोरोनामुळे मृतांचा संख्या वाढल्या आहेत. यामुळे एकाच वेळी 50 ते 60 मृतदेहावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे ठिकाण उभारण्यासाठी महापौरांनी स्माशानभूमीत भेट दिली. या भेटीचा व्हिडिओ तयार करुन व्हायरल करण्यात आले. हा व्हिडिओ जाहिरातीसारखा दिसत असल्याने सामान्य नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया यावर येत आहेत.

चंद्रपूर - एकाच वेळी 50 ते 60 मृतदेह जाळण्याचे ठिकाण उभारण्यासाठी महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली. त्या भेटीवेळी त्या ठिकाणी चिता जळत होत्या. तरीही त्या भेटीचा व्हिडिओ बनविण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर सर्वत्र संताप व्यक्त केले जात आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. सध्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होत आहे. मात्र, 340 कोटी बजेट असलेली महापालिका एक रुग्णालयही उभारू शकले नाही. तिकडे कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी पैसे नाहीत, अशी सबब देत कंत्राटदाराची बिले रोखली जातात. दुसरे वाहन घेण्यासाठी निधी नसल्याने भंगारमध्ये गेलेल्या वाहनाला पुन्हा परवानगी देऊन शवावाहिका म्हणून वापरावे लागते आहे. मात्र, महापालिकेच्या तिजोरीतील हा खळखळाट केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे. पण, अशा आणिबाणीच्या काळात देखील चंद्रपूर महापालिकेने आपल्या प्रसिद्धीसाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. या चमकोगिरीसाठी मनपाने नागपूर येथील आयटी क्राफ्ट नामक कंपनीला वर्षाकाठी 24 लाख 60 हजारांचे कंत्राट दिले आहे. याचा कळस म्हणजे जिथे जीव वाचविण्याची गरज आहे तिथे मरणाची तयारी महापालिका करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढत आहे. अशावेळी स्मशानभूमीची सुविधा कमी पडत आहे. भविष्यात मृतांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे एकाच वेळी 50 ते 60 मृतदेहावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यांचे हे कर्तव्यच आहे, त्यात दिव्य असे काहीच नाही. महापौर राखी कंचर्लावार यांनी पठाणपुरा येथील स्मशानभूमीवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपाआयुक्त विशाल वाघ, स्थायी समिती सभापती रवी आसवाणी, महापौर यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार हे देखील होते. याचे चित्रीकरण करण्यात आले व जाहिरात असल्यासारेखे ते व्हायरल करण्यात आले. यावर नागरिकांमधून संताप व्यक्त केले जात आहे.

महापौरांच्या डागाळलेल्या प्रतिमेला सुधारण्याचा प्रयत्न

महापौर म्हणून राखी कंचर्लावार यांची मागील दोन वर्षांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आहे. लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेकडून झालेल्या डब्बे वाटपात भाजप नेत्यांचे लेबल लावून वितरण केले जात होते. क्वारंटाइन सेंटरमध्ये भोजन पुरविण्याच्या कंत्राटात वस्तूंच्या अवाच्या सवा किंमती लावणे, कचरा संकलनाचे वादग्रस्त कंत्राट, असे अनेक घोटाळ्याचे गंभीर आरोप त्यांच्याच कार्यकाळात झाले. सोबत पक्ष संगठन मजबूत करण्यातही त्यांना अपयश आले. भाजपचे गटनेते वसंत देशमुख, माजी महापौर अंजली घोटेकर अनेकदा आपली वेगळी भूमिका मांडतात. राखी कंचर्लावार यांनी काँग्रेसकडून यापूर्वी महापौरपद भूषविले आहे. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महापौर झाल्या. यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात देखील त्यांच्या विरोधात कुरबूर आहे. कोरोनासारखी गंभीर स्थिती ओढवली असताना महापौर 'ऍक्शन मोड' मध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळेच या डागाळलेल्या प्रतिमेला सुधारण्यासाठी कोरोनाच्या कठीण काळात महापौरांच्या पुढाकाराने प्रसिद्धीचे कंत्राट आयटी क्राफ्ट नामक कंपनीला दिले आहे. पुढील एका वर्षात ही कमी दूर करता यावी, आपल्या नेतृत्वाखाली महापालिका कसे काम करते आहे याचा प्रभाव पाडता यावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, असा आरोप महापौर यांच्यावर होत आहे.

आमचा हेतू प्रामाणिक : महापौर

सध्या मृतांची संख्या वाढली आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. केवळ चंद्रपुरातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कारही येथे होतात. त्यामुळेच स्मशानभूमीचे ओटे वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात काहीच गैर नाही, अशी प्रतिक्रिया महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली आहे.

हेही वाचा - ...अखेर जिल्हाधिकाऱ्यांना सापडला कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी मुहूर्त!

Last Updated :Apr 26, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.