चंद्रपूर - आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना एसटी कर्मचारी संपाचा मोठा फटका बसला आहे. रविवारी परीक्षा संपल्यानंतर आपापल्या गावी परतीसाठी बस न मिळाल्याने परीक्षार्थींना चंद्रपूर एसटी स्थानकातच अडकून राहावे लागले होते. जवळपास ३०० ते ४०० परीक्षार्थी एसटी संपामुळे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी धावून आले.
रविवारी साडे चार वाजता परीक्षा संपल्या नंतर परळी, नांदेड, आदीलाबाद, यवतमाळ येथून आलेल्या विद्यार्थ्यांची चंद्रपूर बसस्थानकावर अचानक गर्दी झाली. जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थी रात्री दहा पर्यंत बस्थानाकावर ताटकळत बसेल. दरम्यान, काही काही विद्यार्थी खासगी बसेसने आपापल्या गावाला जाण्याची व्यवस्था केली, परंतु शेकडो विद्यार्थी बस स्थानकावरच थांबून होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांना परीक्षार्थी बसस्थानकावर अडकले असल्याची माहिती मिळताच त्यांनी परीक्षार्थींची भेट घेतली.
त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविश सिंह यांनी स्वखर्चाने रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून पहाटे ३ वाजता बसची व्यवस्था करुन दिली. या विद्यार्थ्यांना यवतमाळपर्यंत सोडण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. सर्व उपस्थित परीक्षार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहजाद सय्यद, मनविसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, नितीन टेकाम, करण नायर, अनिल राम, रोहित घोरपडे, तुषार येरमे, भीम यादव उपस्थित होते.