ETV Bharat / state

Food Poisson : भंडाऱ्यामधील आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 2:59 PM IST

41 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
41 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

भंडारामधील येरली येथे असलेल्या खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या विद्यार्थ्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत.

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थांना अन्नातून विषबाधा झालीय. एवढ्या मोठ्या संख्येनं एकाचवेळी उपचार करणे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात शक्य नसल्यानं २३ विद्यार्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यासर्व ४१ विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

४१ विद्यार्थ्यांना विषबाधा : गुरुवारी नेहमीप्रमाणे दुपारी साडेबाराच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. जेवणानंतर दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी भोवळ येण्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला एक दोन विद्यार्थ्यांना हा त्रास जाणवू लागला. मात्र एकानंतर एका विद्यार्थाला उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढू लागल्यानं शिक्षकांनी येरली येथील एका डॉक्टरला बोलवले. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहिल्याने शेवटी या विद्यार्थांना तुमसर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला २४ विद्यार्थ्यांना जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र रात्रीपर्यंत ही संख्या ३६ पर्यंत पोहोचली. त्यानंतर आणखी ५ विद्यार्थांना उशिरा रात्री भरती करण्यात आलं. विद्यार्थ्यांची संख्या वाढून ४१ वर पोहोचली. उपजिल्हा रुग्णालयात एवढ्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करणं शक्य नसल्यानं या विद्यार्थ्यापैकी २३ विद्यार्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं.

दोषींवर कारवाईची मागणी : सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. यासर्व विद्यार्थ्यांना काल जेवणामध्ये बटाटा आणि वाटाण्याची भाजी देण्यात आली होती. नेमकी विषबाधा ही कशातून झाली हे अद्यापही समजू शकलं नाही. परंतु या प्रकरणामुळे शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी माजी जिल्हापरिषद सदस्य अशोक उईके यांनी केलीय. तसंच या आदिवासी आश्रमशाळेत परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणीसुद्धा केली जातेय.

हेही वाचा-

  1. Lightning Strike : वीज कोसळून तिघांचा मृत्यू, २५ जण जखमी
  2. Tiger Killed Shepherds : दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.